देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:11 IST2025-01-16T14:53:45+5:302025-01-16T15:11:06+5:30
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं पटोलेंनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी
मुंबई - बॉलिवूड अभिनेते पद्मश्री सैफ अली खान यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या व्रांद्रे भागात या घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे?, मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद सोडावे अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
सैफ अलीच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे. भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे लाडके पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशीर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्रे इथं माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही असं नाना पटोलेंनी सांगितले.
दरम्यान, गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रिय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असा घणाघात नाना पटोलेंनी केला आहे.