जनतेच्या मुळावर याल तर सत्तेवरून खाली खेचू, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 17:37 IST2017-11-15T17:36:41+5:302017-11-15T17:37:09+5:30
रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही.

जनतेच्या मुळावर याल तर सत्तेवरून खाली खेचू, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा
रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेला वेठीस धरण्याचे सरकारचे सध्याचे निर्णय पाहता असे करावेच लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील पक्ष मेळाव्यात बोलताना दिला.
रत्नागिरीतील माळनाका येथे दोन कोटी खर्चातून उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर येथील सावरकर नाट्यगृहात सेना मेळावा झाला. त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, सेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, सरकारला कर्जमाफी करण्यासाठी शिवसेनेने भाग पाडले. मात्र, त्यानंतरही कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचलेली नाही, हे दुर्दैवी आहे. शिवशाही कर्जमाफी योजना असे नाव देऊन शिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही. आम्हाला शिवशाही हवी आहे. चुकीचे वागून लोकांना वेठीस धरणा-यांना धडा शिकवण्याची जी शपथ शिवसैनिकांनी घेतली ती शिवशाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात. तुमची मन की बात काय चाटायची आहे. जनतेच्या मनासारखे निर्णय घेणार नसाल तर मन की बातचा काय उपयोग आहे. जनतेला जे अपेक्षित आहे तेच आम्ही करणार, असे ठाकरे म्हणाले.
राज्यात मोगलाईसदृश स्थिती
राज्यात सध्याची गोंधळाची स्थिती असून जनतेला वेठीस धरणारे निर्णय घेतले जात आहेत. छत्रपतींच्या आधीची मोगलाई असे याचे वर्णन करावे लागेल. सरकारने आता राज्यात मोगलाई आहे, असे एकदाचे जाहीर तरी करावे, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.
...तर देशात मोदींना थारा नाही
गुजरातमधील विधानसभा निवडणूकीमुळेच मोदी सरकारला जीएसटी दर कमी करावे लागले. भाजपविरोधी वातावरणामुळे तेथे मोदींना ५० सभा घ्याव्या लागल्या. एवढे करूनही तेथे भाजप जिंकले नाही, जिंकण्यासाठी गडबड केली नाही, तर देशात मोदींना थारा नाही, हेच स्पष्ट होईल, असे ठाकरे म्हणाले.