गावचा तलाठी अडवणूक करत असेल, तर? काय कराल... जाणून घ्या, सारख्या खेपा माराव्या लागणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 08:31 IST2024-05-07T08:31:10+5:302024-05-07T08:31:51+5:30

वडिलांच्या माघारी सातबारा उताऱ्यावर भावंडांची नावे लावण्यासाठी तलाठी सहकार्य करीत नाही. मुंबईहून सतत गावी जाऊन हेलपाटे मारणे शक्य नाही.

If the Talathi of the village is obstructing? What will you do... Know, you will not have to deal with similar issues | गावचा तलाठी अडवणूक करत असेल, तर? काय कराल... जाणून घ्या, सारख्या खेपा माराव्या लागणार नाहीत

गावचा तलाठी अडवणूक करत असेल, तर? काय कराल... जाणून घ्या, सारख्या खेपा माराव्या लागणार नाहीत

वडिलांच्या माघारी सातबारा उताऱ्यावर भावंडांची नावे लावण्यासाठी तलाठी सहकार्य करीत नाही. मुंबईहून सतत गावी जाऊन हेलपाटे मारणे शक्य नाही. याबाबतीत नागरिकांचे हक्क कोणते आहेत? 
    - अमोल यादव, मुंबई

वडील हयात नसतील तर त्यांच्या नावे असणाऱ्या मिळकतीवर वारस म्हणून मुले-मुली व त्यांची पत्नी यांची नावे लागतील. त्यासाठी वडिलांचा मृत्यू दाखला व रेशनकार्ड घेऊन महा-ई-सेवा केंद्रात जाऊन वारसासंबंधीचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे लागेल. कुटुंबातील कोणी सदस्य गावात राहत असेल तर त्याला ही जबाबदारी सोपवून त्याचे ॲफेडेव्हीट किंवा प्रतिज्ञापत्र तयार करावे. त्यामध्ये सर्व वारसांच्या नावांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र व सोबत वारस नोंद लावण्यासंबंधीचा अर्ज करून त्यावर ५ रुपयांचे तिकीट लावून हा अर्ज आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जमा करावा. या अर्जाबरोबर सर्व वारसांचे जबाब व स्थानिक चौकशीचा पंचनामाही लागतो. जबाबासाठी सर्व वारसांची लिखित संमती लागते. कोणी तलाठी ठरवून त्रास देत असेल तर वारसाचा अर्ज, वारस नोंद करण्याचा अर्ज हे रजिस्टर पोस्टाने तलाठ्याला पाठवावे. त्यावर कार्यवाही करणे तलाठ्यांना बंधनकारक आहे. 

याविषयी सेवानिवृत्त तलाठी भास्करराव निकम म्हणाले, ‘जर कोणा वारसाचा याला विरोध असेल तर संबंधित तलाठ्याला त्याबाबत कल्पना द्यावी आणि ‘एक वारस त्यांना वारस सहीसाठी किंवा संमती देण्यासाठी तयार नसल्याचे’ सांगावे; परंतु विरोध करणारी व्यक्ती सोडून बाकी सर्व वारस वारस नोंदीसाठी तयार असतील तर  जबाबावर त्यांच्या सह्या घेऊन तलाठी ऑफिसमध्ये जमा कराव्यात. यानंतर संबंधित  तलाठी याची नोंद घेऊन ज्या कुणाची संमती नाही किंवा जो कुणी विरोध करतो आहे, अशा वारसाला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवू शकतात. संबंधित व्यक्तीने या नोटिशीला काही उत्तर दिले नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तर पंधरा दिवसांनंतर याची नोंद मंडळ अधिकारी मंजूर करून सातबारा उताऱ्यावर सर्व संबंधित वारसांची नावे लागू शकतात. 

- प्रगती जाधव-पाटील 
वार्ताहर/ उपसंपादक, लोकमत, सातारा
सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com

Web Title: If the Talathi of the village is obstructing? What will you do... Know, you will not have to deal with similar issues

टॅग्स :Governmentसरकार