‘अबू आझमी’ना वारीचे महत्त्व समजावून सांगेन : हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:27 IST2025-06-24T13:25:58+5:302025-06-24T13:27:08+5:30
कोल्हापूर : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना वारी आणि वारकरी संप्रदायच समजलेला नाही. ते भेटल्यानंतर मी त्यांना वारी ...

‘अबू आझमी’ना वारीचे महत्त्व समजावून सांगेन : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना वारी आणि वारकरी संप्रदायच समजलेला नाही. ते भेटल्यानंतर मी त्यांना वारी आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व समजावून सांगेन, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सोमवारी कोल्हापुरात विचारले असता त्यांनी हे सांगितले. मुश्रीफ म्हणाले, वारी ही वर्षातून एकदा असते. नमाज हा दिवसातून पाचवेळा असतो.
वाचा - वारीवर बोलणाऱ्याचे थोबाड रंगविणार, आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा
नमाजही आपण अशा ठिकाणी पढली पाहिजे की त्याचा लोकांना त्रास होता कामा नये. वर्षातून एकदाच निघणाऱ्या वारीमध्ये लाखो वारकरी, साधूसंत आणि भाविक सहभागी होत असतात.
काय म्हणाले होते अबू आझमी..
आतापर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा मशिदीतील काही लोक ५ ते १० मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करू. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतो, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते, अशा आशयाचे विधान अबू आझमी यांनी केले होते.