Eknath Shinde Clarification on Jai Gujarat Statement: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले. त्यातच मराठीत न बोलल्याने काहींना मारहाण करण्याचेही प्रकार घडले. प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधानही केले. त्याच दरम्यान आज पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात म्हणाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यावर आता शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"पुण्यात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या गुजराती बांधवांनी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. त्यात सर्वसामान्य लोकांना विविध सोयी आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे आज लोकार्पण झाले. मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र तर म्हणतच असतो, जय हिंद हा देशाचा अभिमान तर जय महाराष्ट्र हा राज्याचा अभिमान. त्यासोबत मी शेवटी जय गुजरात म्हणालो, कारण समोरची सगळी लोकं गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली. तिथे जो प्रकल्प उभा राहिला आहे, तो सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी तसे म्हणालो," असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले.
"माझ्या या वक्तव्यानंतर जे लोक टीका करण्याचे काम करत आहे, त्या लोकांबद्दल मी जास्त काही भाष्य करू इच्छित नाही. पण मी एवढेच सांगेन की जिनके घर शिशे के होते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही मारा करते..." असा सणसणीत टोला शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला. त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा जय गुजरात अशी घोषणा देतानाचा व्हिडीओ दाखवला. तसेच, उबाठाच्या अधिकृत पेजवरील गुजराथी भाषेतले पत्र दाखवले. त्याचसोबत आदित्य ठाकरे यांचे 'केम छो वरळी' हे पोस्टरही दाखवले.