अर्थकारणामध्ये महाराष्ट्र कुठे?; आपली ताकद जागतिक पातळीवर दाखवण्याची अनमोल संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 07:46 IST2025-02-09T07:44:45+5:302025-02-09T07:46:19+5:30
मुद्द्याची गोष्ट : दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलबाला राहिला तो महाराष्ट्राचा. या जागतिक पातळीवरील परिषदेत भारतामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक आली ती महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात उत्तम नियोजन केले व त्यानुसार सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणण्यात मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी ठरले.

अर्थकारणामध्ये महाराष्ट्र कुठे?; आपली ताकद जागतिक पातळीवर दाखवण्याची अनमोल संधी
भरत गिते
मुख्य कार्यकारी अधिकारी,
तौराल इंडिया प्रा. लि.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जागतिक पातळीवरील उद्योगासंबंधित परिषद आहे. जागतिक पातळीवर नेटवर्किंग करण्यासाठी हे खूप मोठे व्यासपीठ आहे. आपापल्या देशाचे वा राज्याचे उद्योगासंबंधीच्या धोरणांचे सादरीकरण करण्यासाठीही ही मोठी संधी असते. त्यामुळे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जाऊन तिथे सामंजस्य करार करण्याने आपली ताकद जागतिक पातळीवर दाखवण्याची ही अनमोल संधी असते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये २०१४ ते २०१९ दरम्यानच्या काळात उद्योगासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले होते. त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये २०१६ मध्ये मुंबईतील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत आमचा पहिला सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये मी तौराल इंडिया ही कंपनी सुरू केली. त्यावेळी आम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ जमीन व इतर सुविधा उपलब्ध केल्या. वास्तवामध्ये मी सुमारे ३५० कोटी रुपयांची त्यावेळी परकीय गुंतवणूक आणली व त्यातून सुमारे ८०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, सरकारने उद्योगासाठी सकारात्मक वातावरण तयार केले आणि पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध केल्या, तर उद्योगाचा विस्तार, वाढ व विकास झपाट्याने व्हायला वेळ लागत नाही. त्याचा अनुभव मी फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतला आहे. आता २०२४ मध्ये पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची इकॉनॉमी १ ट्रिलियन डॉलरची करण्याचा संकल्प केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ५ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचे ठेवलेले लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. याचाच भाग म्हणून आपण दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षांत महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा संकल्प केला आहे.
सुपा (अहिल्यानगर) मध्ये ५०० कोटींची गुंतवणूक; १२०० लोकांना रोजगार!
तौराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावोसमध्ये जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या परिषदेत महाराष्ट्र सरकारबरोबर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसीमध्ये ५०० कोटी रुपयांची आपण गुंतवणूक करणार आहोत. सुपा येथे होणारा प्रकल्प हा आमच्या उद्योगाचा विस्तार असणार आहे. त्याठिकाणी १२०० लोकांना रोजगार निर्माण होणार आहे.
सुपा हे पुण्या-मुंबईच्या तुलनेत लहान ठिकाण. परंतु, बीड जिल्ह्यातील परळीसारख्या एका छोट्या शहरातून आल्यामुळे मला नेहमीच टियर २ भागांतील लोकांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेवर विश्वास राहिला आहे. त्यांच्या प्रगतीसाठी संधी शोधण्याचा माझा कायमच निर्धार राहिला. २०२० मध्ये मी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो तेव्हा त्यांच्याशी या दृष्टिकोनाबद्दल चर्चा करण्याचे भाग्य मला मिळाले. आज त्यांच्याच दूरदृष्टीमुळे हे स्वप्न साकार होत असल्याचे पाहून अभिमान वाटतो.
विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड् ससाठी विश्वासू भागीदार
जागतिक कौशल्य आणि नवकल्पनांचे संयोजन करून, सुपाला उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे. तौराल इंडियाकडे ॲल्युमिनियम सँड-कास्टिंग सोल्युशन्समध्ये उत्पादन डिझाइनपासून ते गुणवत्तेची चाचणी, पेंटिंग, उत्पादन बांधणी, असेंब्ली व वितरणापर्यंत एकाच ठिकाणी सेवा पुरविण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. अहिल्यानगरला औद्योगिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या ध्येयाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तौराल इंडियाचा सुपा प्रकल्प योगदान देईल.
जर्मनी आणि पोलंडमधील ॲल्युमिनियम कास्टिंग तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या थोनी अल्युटेक ग्रुपसोबत संयुक्त उपक्रम म्हणून स्थापित करून तौराल इंडियाने भारतात तांत्रिक कौशल्य व क्षमता धोरणात्मक पद्धतीने विकसित केल्या आहेत. ही कंपनी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्ससाठी विश्वासू भागीदार बनली आहे. यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी (संरक्षण), भारतीय रेल्वे, एबीबी, जनरल इलेक्ट्रिक, सिमेन्स आणि ह्योसंग यांसारख्या प्रतिष्ठित क्लायंटचा समावेश आहे.