सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 20:59 IST2022-03-08T20:57:59+5:302022-03-08T20:59:51+5:30
फडणवीसांच्या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत

सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री म्हणतात...
मुंबई: विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. त्यांच्या विधानावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. उद्या सभागृहात या प्रकरणी बोलणार असल्याचं वळसे पाटील म्हणाले.
मी पेन ड्राईव्हमधले व्हिडीओ पाहिले नाहीत. ते पाहिल्यावर मी त्यावर बोलेन. उद्या सभागृहात याबद्दलची भूमिका मांडेन, असं वळसे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. पोलिसांचा गैरवापर फडणवीस सरकारच्या काळापासून सुरू झाला. त्यांच्याच कार्यकाळात रश्मी शुक्लांनी विरोधकांचे फोन टॅप केले होते, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पलटवार केला.
विरोधकांना अडकवण्यासाठी कारस्थान; फडणवीसांचा गंभीर आरोप
धाडी टाकणाऱ्या पोलिसांना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. त्यासाठी खोटे पंच, खोटे साक्षीदार उभे करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन, संजय कुटे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मला अडचणीत आणण्यासाठी कट रचण्यात आले. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सगळे आदेश दिले. धाडी कशा टाकायच्या, चाकू कसे ठेवायचे, मोक्का कसा लावायचा, यासंदर्भात सगळ्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. सरकारच्या मदतीनं हे कारस्थान शिजलं, असे धक्कादायक आरोप फडणवीस यांनी केले.
खोट्या तक्रारी करून खोटे साक्षीदार उभे करून विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचलं गेलं. विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात विरोधकांच्या विरोधात कट शिजवण्यात आला. या प्रकरणात एफआयआर सरकारी वकिलांनीच लिहून दिला आणि साक्षीदारही दिला. या सगळ्या संभाषणांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तब्बल सव्वाशे तासांचं फुटेज आहे. त्यावर २५ ते ३० भागांची वेब सीरिज निघेल आणि हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे, असा दावा फडणवीसांनी केला.