"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:48 IST2025-06-28T12:41:50+5:302025-06-28T12:48:47+5:30
मराठी आणि हिंदी स्पर्धा झाली तर मराठीलाच प्राधान्य आहे. मराठीपुढे इतर कुठलीही भाषा नाही हे आमचे मत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई - मी कुणासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. महापालिका निवडणुका नसत्या तर कदाचित या निर्णयाला इतका वेगळा विरोध झाला नसता. राज ठाकरेंची भूमिका आणि आमची भूमिका वेगळी आहे. सगळ्याच भूमिका सारख्या असत्या तर एका पक्षात राहिलो असतो. भूमिका वेगळी असू शकते. परंतु उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि त्याविरोधातच आता बोलतायेत. याचा अर्थ राजकीय आहे. या राज्यात माशेलकर, मुणगेकर यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल का? देवेंद्र फडणवीसांना राजकारण करायचे आहे असं बोला, पण तज्ज्ञांनी एखादा रिपोर्ट दिला. तो तुम्ही मुख्यमंत्री असताना स्वीकारला आणि आता त्याउलट जात आहात याचा अर्थ हे मराठीचे प्रेम नाही तर हे राजकीय आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे, हिंदी सक्ती नाही. हिंदी पर्यायी भाषा आहे. हिंदी किंवा अन्य कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र दिले आहे. हे सूत्र आपण स्वीकारले आहे. जेव्हा २०२० साली हे धोरण आले तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या धोरणावर अभ्यास करण्यासाठी कमिटी तयार केली. त्याचे अध्यक्ष माशेलकर होते. त्यात डॉ. मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख १८ मंडळी होती. या सर्वांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो २०२१ साली उद्धव ठाकरे सरकारला दिला. तो रिपोर्ट तेव्हाच्या सरकारने स्वीकारला. हा तोच रिपोर्ट आहे ज्यात त्रिभाषा सूत्र सांगितले आहे आणि त्यात स्पष्टपणे मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्ती करा असं अहवालात म्हटले आहे. त्यावेळच्या बातम्या पाहा, वेगवेगळ्या भाषा शिकायला हव्यात असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहात का? असा सवाल त्यांनी विचारला. न्यूज १८ लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
तसेच काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. ही एक प्रक्रिया आहे त्यात आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजे त्यादृष्टीने तयार केलेले त्रिभाषा सूत्र आहे. विद्यार्थ्यांचे जे ब्रेन आहे ज्यात सर्वात जास्त भाषा शिकवण्याचा काळ कधी आहे याचा अभ्यास करून त्यावेळी या भाषा मुलांना शिकवल्या तर अधिक भाषा ते शिकू शकतात हे समोर आले आहे. हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. हिंदी शिकली पाहिजे असे नाही कुठलीही भाषा शिका. हिंदी सक्तीचा हा प्रश्न नाही. हिंदी भाषेला विरोध आहे. या लोकांचा विरोध हिंदीला आहे. भारतात तुम्हाला इंग्रजी चालते, इंग्रजीला विरोध नाही. हिंदीला विरोध आहे. हा विरोधाभास आहे. मराठी आणि हिंदी स्पर्धा झाली तर मराठीलाच प्राधान्य आहे. मराठीपुढे इतर कुठलीही भाषा नाही हे आमचे मत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, मराठी आमची मायबोली आहे. सक्ती मराठीच हवी. पण आपल्या मुलांना तीन भाषा शिकायला हव्यात अन्यथा नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे मुलांना क्रेडिट मिळणार नाही. त्याला क्रेडिट मिळाले नाही तर उद्या तो आयआयटी, एम्स, सीईटी, मेडिकलला जाईल त्यावेळी त्याचे क्रेडिट कमी पडतील. त्यामुळे चांगले मार्क्स घेऊनही क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्त असल्याने त्याला प्रवेश मिळाला नाही तर हे विद्यार्थ्याचे नुकसान आहे. आपल्या मराठी मुलांचे नुकसान होईल. भावनेपेक्षा वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे. आपण जेव्हा सत्तेत असतो तेव्हा वस्तूस्थिती समजून घ्यायची, कमिटी बनवायची, रिपोर्ट स्वीकारायचा आणि विरोधी पक्षात गेल्यावर भूमिका बदलायची असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.