कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:38 IST2025-06-26T14:37:16+5:302025-06-26T14:38:07+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray News: त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही असं राज यांनी सांगितले.

कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
मुंबई - राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ६ जुलैला सरकारच्या या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल असं सांगत राज यांनी सर्व राजकीय पक्ष, मराठी कलावंत, साहित्यिक यांना मोर्चात येण्याचं आवाहन केले आहे. त्यात या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसेल अशा प्रकारचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले आहेत.
या मोर्चाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध केल्याचे सांगत ते या मोर्चात येतील का असं विचारले. पत्रकारांच्या या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर तेदेखील त्यात आले. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्या नेत्यांशी बोलणार. आमची माणसे त्यांच्या लोकांशी बोलतील. ज्या विधानावरून जे सगळं चाललेय ते विधान तुम्हाला आठवत असेल, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल असं राज यांनी म्हटले.
तसेच रविवार यासाठी आहे जेणेकरून सगळ्यांना येणे सोपे जाईल. महाराष्ट्राची ताकदही त्यातून सरकारला दिसेल. रविवार आहे शाळा बंद असतात, पालकांना-विद्यार्थ्यांना यायला सोपे आहे. त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही. राज्यांवर ही गोष्ट सोपवलेली नसताना राज्य सरकार हिंदी भाषा का आणतेय हे कळत नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी सीबीएसई शाळा राज्यात आणल्या होत्या. मात्र आता या शाळा राज्यांतील शाळांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतेय. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंचाही सरकारला इशारा
दरम्यान, महाराष्ट्रावर हुकूमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवली हे दिसून आली. कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. जे आंदोलन उभे राहील त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील. हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि राहणारच...हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी बॉलिवूड उभे राहिले. आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा आहे. कालांतराने देशात एकच पक्ष राहील त्यादिशेने ही वाटचाल सुरू आहे. सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जातेय त्याचा विरोध आम्ही करणारच आहोत. बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे गद्दारांना कळायला हवे. हिंदी सक्ती नको म्हणजे नको, हिंदी शिकली नाही तरी ती येते. ही सक्ती आम्ही मान्य करणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.