मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव घेऊन कोण जाणार ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांना मनसेशी युती करायची का? अशी विचारणा केली आणि माजी नगरसेवकांनीही निवडून येण्याच्या आशेवर सकारात्मक प्रतिसाद देत, मुंबईत युती केल्यास निश्चित फायदा होईल, असे मत व्यक्त केले. उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा गेले काही दिवस सर्वसामान्यांमध्ये होत आहे. मनसेकडून याबाबत आधीच भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
२०१४ आणि २०१७ मध्ये मनसेने युतीबाबत प्रस्ताव दिला, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून युती करण्याबाबत प्रस्ताव आल्याशिवाय मनसेकडून प्रतिसाद दिला जाणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाकडे गेल्यानंतर, गेले वर्षभर मागणी करीत असलेल्या माजी नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक मातोश्री निवासस्थानी बुधवारी घेतली. यापुढे माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे बसून जनतेची गाऱ्हाणी ऐकावीत, यासाठी निवडणूक कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.
विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाहीतुम्ही निष्ठावंत आहात, या कठीण काळात सोबत राहिलात, असे म्हणत, तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय युतीचा निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी या माजी नगरसेवकांना दिली. यामुळे माजी नगरसेवकांची नाराजी काही प्रमाणात दूर झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यात नाराजीमुळे सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्याबाबत साशंकता व्यक्त होत होती; मात्र त्या बैठकीला मातोश्रीवर गेल्या होत्या, अशी माहिती शिवसेना उपनेते आणि तेजस्विनी यांचे सासरे विनोद घोसळकर यांनी दिली.