अंतिम आठवडा प्रस्तावावरून विधानसभेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:21 IST2017-08-10T14:17:39+5:302017-08-10T14:21:27+5:30
भाजपा नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन विधानसभेत फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

अंतिम आठवडा प्रस्तावावरून विधानसभेत गोंधळ
मुंबई, दि. 10- भाजपा नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन विधानसभेत फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. अंतिम आठवडा प्रस्तावाचा अधिकार विरोधकांचा असल्याचं सांगतं एकनाथ खडसे यांनी नियमावर बोट ठेवून सरकारची कोंडी केली. तर सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.
अंतिम आठवडा प्रस्ताव ठरवण्याचा अधिकार हा विरोधकांचा आहे. जर विषय जास्त असतील तर अध्यक्ष विरोधकांना विषय कमी करण्याची विनंती करतील, पण अंतिम आठवडा प्रस्तावातील बदल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी संगनमतानं करायचे असतात, असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. खडसेंनी त्यांच्या या वक्तव्याने सरकारला घरचा आहेर दिला आहे.
एकनाथ खडसेंच्या विधानाचं विरोधकांनी स्वागत केलं. सरकारनं आमचा आवाज बंद केला आहे. कोणते मुद्दे चर्चेला घ्यावे हे आम्ही ठरवणार, तसंच सरकार मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
'सर्व भ्रष्ट मंत्री तसंच प्रकाश मेहता यांची चौकशी व्हावी. विश्वास पाटील यांची चौकशी कधी होणार? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात विचारला. या नेत्यांची चौकशी निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली व्हावी. तसंच राधेश्याम मोपलवार आणि मेहता यांची चौकशी निष्पक्ष व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मोपलवर आणि मेहता प्रकरणी त्यांनाच विचारून चौकशी लावली जात आहे, अशी माहिती समजली असून मुख्यमंत्री त्यांना क्लीन चिट देतात, याला आमचा विरोध आहे. विशेष म्हणजे असे विषय अंतिम आठवडा प्रास्तावातून वगळले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.