शेतकरी हवालदिल, भोंदूबाबांचे पीकही वाढले, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:11 IST2026-04-12T06:10:29+5:302026-04-12T06:11:54+5:30
Sripal Sabnis: राज्यात भोंदूबाबांचे पीक जोमात वाढत असताना शेतकरी हवालदिल झाले आहेत, आत्महत्या करत आहेत, गोरगरिबांचे कल्याण करू, असे म्हणणाऱ्या सरकारच्या प्रत्येक योजना वांझ ठरत आहेत, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.

शेतकरी हवालदिल, भोंदूबाबांचे पीकही वाढले, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले मत
सोलापूर - राज्यात भोंदूबाबांचे पीक जोमात वाढत असताना शेतकरी हवालदिल झाले आहेत, आत्महत्या करत आहेत, गोरगरिबांचे कल्याण करू, असे म्हणणाऱ्या सरकारच्या प्रत्येक योजना वांझ ठरत आहेत, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.
सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्यातर्फे आयोजित या तिसऱ्या संमेलनाच्या व्यासपीठावर उद्घाटक माधव गादेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, अध्यक्ष बी. आर. कलवले, स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले, ललिता सबनीस, कुमार करजगी, डॉ. ऋत्विक जयकर, दिगंबर ढेपे, संयोजक भरतकुमार मोरे, माजी महापौर नलिनी चंदिले, प्रा. भीमाशंकर बिराजदार, श्रीकांत बोराडे, आदी उपस्थित होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
संतांचे विचार आत्मसात
सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नाही, असे सांगून सबनीस म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले आणि शिक्षणाची गंगोत्री समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविली.
कर्मवीरांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक महापुरुषांचे विचार एकवटलेले दिसून येतात. संमेलनाची सुरुवात सकाळी हुतात्मा पुतळा येथून निघालेल्या ग्रंथदिंडीने झाली. सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात दिंडीचा समारोप झाला.