आदित्य ठाकरेंच्या टीकेवर शिंदेसेना संतप्त; म्हणाले, "आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ..."
By प्रविण मरगळे | Updated: March 18, 2025 22:19 IST2025-03-18T21:05:10+5:302025-03-18T22:19:10+5:30
हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या टीकेवर शिंदेसेना संतप्त; म्हणाले, "आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ..."
मुंबई - राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादातून नागपूर येथे हिंसाचार घडला, त्यानंतर याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळात उमटले. ओरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचार यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. मात्र याचवरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. स्वत:च्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड असल्याचं सांगत औरंग्यावर बोलणारे हे कोण असा सवाल उपस्थित केला. त्यावरून शिंदेसेना संतप्त झाली असून त्यांनी आदित्य ठाकरे आजचे सूर्याजी पिसाळ असल्याचा पलटवार केला.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला..त्याच्यावर बोलणारे हे कोण?, रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून! जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा! स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला... त्याच्यावर बोलणारे हे कोण?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 18, 2025
तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही…
यावर शिंदेसेनेही पलटवार करत त्यांच्या ट्विटवर उत्तर दिले आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करुन औरंगजेबी विचारांचा हात धरणारे आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ आहेत. सत्तेसाठी काँग्रेसी गुळाला चिकटलेले हे मुंगळे बाळासाहेबांनी वेळीच चिरडून टाकले असते. ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाठा आणि आदूबाळ हिंदुत्वाच्या विरोधात कट रचत आहेत, त्यांच्याच काळात औरंग्याच्या कबरीला कायदेशीर संरक्षण दिले ह़ोते. या दोघांच्यात थोडीही जनाची नाही तर मनाची शिल्लक असेल तर त्यांनी काँग्रेसचा निषेध करण्याची हिंमत दाखवावी असं शिंदेसेनेने म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे नातेसंबंध न पाहता केवळ शौर्य आणि नेतृत्वगुणाला महत्त्व देणारे होते. त्यांने नाव घेणारे आजचे महाराष्ट्र द्रोही मात्र नकळत्या वयातल्या लेकराला मंत्री करतात. मग पोरगं खांद्यावर बसलं की एक पाय वर करतं आणि भूंकतंही अशी खोचक टीकाही शिंदेसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंवर करण्यात आली आहे.