एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:08 IST2025-07-04T17:04:30+5:302025-07-04T17:08:10+5:30
Eknath Shinde Jai Gujarat, Devendra Fadnavis Sharad Pawar : "एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणल्यावरून इतका बवाल करायची गरज नाही"- मुख्यमंत्री फडणवीस

एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
Eknath Shinde Jai Gujarat, Devendra Fadnavis Sharad Pawar : पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात म्हणाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर शिंदे यांची पाठराखण केली. तसेच, राष्ट्रवादी शप गटाचे शरद पवार यांचे नाव घेत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले फडणवीस?
"कर्नाटकात चिकोडी येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार यांनी 'जय महाराष्ट्र, जय कर्नाटक' म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असे समजायचे का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे 'जय गुजरात' म्हणाले. त्यावरून एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रावरील आणि मराठी माणसावरील प्रेम कमी झाले आणि गुजरात वर जास्त प्रेम आहे असा संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावले आणि संपूर्ण भारताला स्वतंत्र केले. दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचे काम मराठी माणसाने केले. एवढा संकुचित विचार कोणी करत असेल, तर ते चुकीचं आहे," असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
🕟 4.27pm | 4-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2025
LIVE | Media Interaction#MonsoonSession2025#Mumbai#Maharashtrahttps://t.co/6TnxEvB47X
"विरोधकांच्या जवळ मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांचा लोकांशी संपर्क राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय आहे ते त्यांना माहिती नाही. म्हणूनच ते असे मुद्दे उचलतात, जे मुद्दे लोकांवर काहीही परिणाम करणार नाहीत. शिंदे यांनी 'जय गुजरात' म्हणण्यावरून इतका गोंधळ घालण्याची गरज नाही. मराठी माणसाला महाराष्ट्राचा अभिमान असायलाच हवा. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या राज्यांबद्दल त्याला तिटकारा असला पाहिजे. पाकिस्तानबद्दल तिरस्कार समजून घेतला जाऊ शकतो, पण शेजारील राज्यांबाबत तिरस्कार असू शकत नाही. त्यामुळे या वक्तव्याने शिंदे यांच्या महाराष्ट्र प्रेमाबाबत कोणी शंका घेत असेल, तर ते अतिशय संकुचित विचार करत आहेत असेच मी म्हणेन," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली.