माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:37 IST2025-01-31T15:36:23+5:302025-01-31T15:37:02+5:30

माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला. 

Dhananjay Munde's reaction to the statement made by Bhagwan Gad Namdev Shastri Maharaj | माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले

माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले

बीड - माझ्यावर आलेले संकट आजचं नाही, गेल्या ५३ दिवसांपासून मला टार्गेट करण्यात येतंय. त्यात भगवान गड आपल्या पाठीशी उभा राहतो त्यामुळे निश्चित आपली मोठी जबाबदारी वाढली आहे असं सांगत धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री महाराजांनी केलेल्या विधानावर भाष्य केले. 

पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, भगवान गड माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे. यासारखी ताकद आणि न्यायाचार्यांचा इतका मोठा विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. भगवान गड गरीबातल्या गरीब माणसाच्या पैशातून उभा राहिला. हा भगवान गड माझ्या पाठीशी संकटात उभा आहे. ही माझ्यासाठी शक्ती आहे. या शक्तीचे वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याची फार मोठी जबाबदारी टाकली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावर दर्शनासाठी आलो नव्हतो, काल रात्री इथं आलो, दर्शन घेतले आहे. आता दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे. अनेक वर्षानंतर भगवान गडावर मुक्कामाला आलो. आज ५३ दिवस झाले, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया मला टार्गेट करून मिडिया ट्रायल चालवलं जातंय. यात कधीही मी अवाक्षर बोललो नाही. आज मुंबईकडे जाताना भगवान गडावर मुक्काम करून पुढे जायचं हे ठरवलं. भगवान बाबांचे दर्शन झाल्यानंतर शक्ती, प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांसाठी लढण्याची ताकद मिळते असं धनंजय मुंडेंनी सांगितले. 

दरम्यान, न्यायाचार्य बाबांसोबत मी कधीही राजकीय चर्चा केली नाही. जी काही चर्चा होते ती अध्यात्मावर होती. ज्ञानेश्वरीतील अनेक अनुभव सांगतात ते ऐकल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी मिळते. स्वत:चे आणि लाखो लोकांचे जीवन चांगले बनण्यासाठी उपयुक्त ठरते. जे काही प्रकरण घडलंय, ५३ दिवस झालेत. संतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली, त्या हत्येतील आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. यात जे कुणी दोषी असतील कुणालाही सोडू नये. शासन झाले पाहिजे ही पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. काही जण राजकारण करत असतील ते माझा राजीनामा घेण्यासाठी आहे की संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्यासाठी आहे. माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला. 

संकटातून बाहेर येण्याचा आत्मविश्वास

संत भगवान बाबाचा मी भक्त आहे. नामदेव शास्त्रीबाबांचा भक्त आहे. या ठिकाणी कायम श्रद्धा असते. याचं दर्शन घेतल्यानंतर काम करण्याची ऊर्जा मिळते. असा गड आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यातून एक आत्मविश्वास मिळतो. हा आत्मविश्वास घेऊन या संकटातून बाहेर निघून मायबाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे याच्या पलीकडे काहीच नाही असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

Web Title: Dhananjay Munde's reaction to the statement made by Bhagwan Gad Namdev Shastri Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.