"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:54 IST2025-06-28T12:50:21+5:302025-06-28T12:54:36+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे.

"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून राज्य सरकार आणि मराठी भाषा प्रेमी आमने-सामने आले आहेत. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे ५ जुलै रोजी आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, असं विधान केलं आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र झालेल्या मराठी-हिंदी भाषा वादावरून केलेल्या सूचक ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना खूपच धूर्त म्हणावं लागेल. प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात. मागच्या अधिवेशनात झटका की हलाल आणि औरंगजेबाची कबर हे विषय होते. या वेळी हिंदी भाषेचा विषय पुझे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार. म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको.
फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) June 27, 2025
प्रत्येक अधिवेशनाआधी एक पासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात. मागच्या अधिवेशनात ‘झटका की हलाल’ आणि ‘औरंगजेबाची कबर’ होती. या वेळी ‘हिंदी भाषेचा’ विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार.
म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको.
दरम्यान, हिंदीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतैक्य दिसत आहे. त्याचवेळी सत्तारुढ महायुतीत मतैक्याचा अभाव असल्याचे चित्र आहे. मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते केवळ मोर्चासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे.
पुढचे राजकारणही ते खांद्याला खांदा लावून करतील की नाही या बाबत स्पष्टता नाही. मात्र, त्याची सुरुवात म्हणून ५ जुलैच्या मोर्चाकडे बघितले जात आहे. दोन ठाकरे एकत्र आले तर ते महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार गट या दोन पक्षांना मान्य असेल का या बाबतही अद्याप स्पष्टता नाही, अशी माहितीही समोर येत आहे.