“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; विकास, रोजगार आणि समृद्धीचा रोडमॅप”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:39 IST2026-02-02T10:37:38+5:302026-02-02T10:39:17+5:30
Deputy CM Eknath Shinde: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसभेला संबोधित केले.

“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; विकास, रोजगार आणि समृद्धीचा रोडमॅप”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde: वाळवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथील जाहीर सभेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, असा संदेश देत त्यांनी मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांना संबोधित करत होते.
सभेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेते अजित पवार यांना भावपूर्ण अभिवादन करत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा उल्लेख केला. या कठीण काळात संयम आणि संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन करत त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमीला वंदन करत, प्रचार करताना संयम, साधेपणा आणि सकारात्मकता राखण्याचा सल्ला दिला. कोणत्याही टीका-टिप्पणीमुळे समाजातील भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
‘लाडकी बहीण योजना’ ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगितले. या योजनेमुळे महिलांना थेट आर्थिक अधिकार मिळाल्याचा दावा करत, महिला बचत गट, स्वयंरोजगार, लघुउद्योग, उत्पादन केंद्रे आणि क्रेडिट सोसायट्यांच्या माध्यमातून हजारो महिलांना सक्षम बनवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सुरक्षित होते आणि समाजाची प्रगती वेगाने होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच वाळवा तालुका कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यात येत असल्याने सिंचनाच्या प्रलंबित योजना पूर्ण केल्या जातील. कालव्यांची दुरुस्ती, उपसा सिंचन योजनांचे वीजबिल, तसेच डीपीडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक निधी दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था आणि सहकार क्षेत्रातील प्रयोगांमुळे हा तालुका राज्यात एक महत्त्वाचे केंद्र बनल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांच्या हाताला काम देणे ही सरकारची प्राथमिकता
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १३८ कोटींचे रस्ते मंजूर झाले असून, २१ नवीन रस्ते आणि पुलांसाठी सुमारे १०८ कोटींचा अतिरिक्त निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. वाळवा–इस्लामपूर मार्ग तसेच वाळकेश्वर पूल जोडणाऱ्या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसी प्रकल्प कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवला जाईल. स्थानिक उद्योग, कृषी प्रक्रिया, पर्यटन आणि लघुउद्योगांना चालना देऊन तरुणांच्या हाताला काम देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा नदीच्या काठावर पर्यटनाच्या दृष्टीने बोटिंग क्लब आणि अन्य सुविधा उभारून स्थानिक रोजगारनिर्मिती केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र, ग्रामीण विकास, इतिहास आणि सामाजिक योगदान, यावरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.
दरम्यान, सभेच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश देत सांगितले की, पहेलगाम हल्ल्याच्या कठीण प्रसंगी चंद्रहार पाटील आणि यांच्यासह बाराशे पैलवानांनी सैनिकांसाठी रक्तदान करून माणुसकीचे उदाहरण ठेवले आहे. विकास, रोजगार आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, धनुष्यबाणाला मत देऊन उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.