“महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान”: DCM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:21 IST2026-04-01T09:20:35+5:302026-04-01T09:21:55+5:30
Deputy CM Eknath Shinde: जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

“महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान”: DCM शिंदे
Deputy CM Eknath Shinde: जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारत जैन महामंडळ आयोजित 2625 वा श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दादर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जैन समाजाच्या कार्याचा गौरव करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जैन समाज नेहमीच सेवा, सहअस्तित्व आणि करुणेचा संदेश देत आला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य सातत्याने केले जात आहे. त्यांनी अशा संस्थांची भूमिका समाजात नैतिकता आणि संस्कार बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सांगितले.
एक छोटी चूकही संपूर्ण मानवजातीसाठी घातक ठरू शकते
आजच्या परमाणु युगात एक छोटी चूकही संपूर्ण मानवजातीसाठी घातक ठरू शकते. अशा वेळी भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेशच जगाला विनाशापासून वाचवू शकतो.” त्यांनी स्पष्ट केले की, हिंसा केवळ शस्त्रांद्वारे होत नाही, तर शब्द, विचार आणि वर्तनातूनही ती प्रकट होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाणीमध्ये मधुरता, विचारांमध्ये शुद्धता आणि वर्तनात करुणा ठेवणे आवश्यक आहे. मला काय मिळाले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची वृत्ती जोपासली गेली पाहिजे. हेच भगवान महावीरांचे खरे तत्त्वज्ञान आहे. पुढे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करत एकनाथ शिंदे यांनी केवळ उत्सव साजरे करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण जीवनात करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
दरम्यान, जिथे ‘मी’ आणि ‘माझे’ संपते, तिथूनच अहिंसेची सुरुवात होते. महावीरांचा संयम, संतुलन आणि त्यागाचा मार्ग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. जर व्यक्ती, समाज आणि राष्ट्रांनी हे तत्त्वज्ञान स्वीकारले, तर अनेक संघर्ष आपोआप कमी होतील. तसेच युवकांना उद्देशून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत महावीरांच्या विचारांवर विशेष मार्गदर्शन होण्याची गरज व्यक्त केली. शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत “जय जिनेंद्र, जय महावीर” असा संदेश दिला.