दादरच्या गणेश भुवनला पुरेसे पाणी मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:45 IST2025-06-21T12:44:01+5:302025-06-21T12:45:38+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

दादरच्या गणेश भुवनला पुरेसे पाणी मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. गिरगाव व दादरमधील जुन्या चाळींना या समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. दादरमधील ९५ वर्ष जुन्या गणेश भुवन या इमारतीलाही साधारण गेल्या दीड वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने संतप्त रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
गणेश भुवन या तळमजला अधिक तीन मजली इमारतीमध्ये ८० कुटुंबे राहत आहेत, तर १० दुकाने आहेत. या इमारतीला पूर्वीपासून दुपारी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत जास्त दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र, दीड वर्षापूर्वी पाणी कपातीच्या नावाखाली महापालिकेकडून इमारतीच्या पाण्याचा दाब कमी करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत पाणी येण्याची वेळ दुपारी चार ते रात्री सात, अशी असली तरी पूर्वीसारखे जास्त दाबाने पाणी येत नाही. परिणामी पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.
आंदोलनाचा पवित्रा
महापालिकेकडे याबाबत रहिवाशांनी तक्रार केली असता महापालिकेने पाण्याची टाकी बसविण्यास सांगितले. मात्र, १०० वर्षे जुन्या इमारतीवर पाण्याची टाकी कशी बसविणार ? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. दरम्यान, पाण्याचा दाब वाढवावा, या मागणीसाठी रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच याप्रश्नी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही अधिकारी इमारतीमध्ये टाकी बसवा, अशी अव्यवहार्य सूचना देऊन निघून जात आहेत. जुन्या इमारतीमध्ये टाकी कशी बसविणार ? प्रेशर कमी न करता वेळ कमी केल्यास अडचण सुटेल. मात्र, प्रेशर कमी केल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यावर तातडीने ठोस तोडगा काढावा, असे रहिवासी सिद्धेश देसाई म्हणाला.