शालेय पोषण आहाराचा कोट्यवधीचा बारदाना दुर्लक्षित
By Admin | Updated: May 29, 2014 01:13 IST2014-05-29T01:12:01+5:302014-05-29T01:13:02+5:30
तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शालेय पोषण आहाराचा कोट्यवधीचा बारदाना दुर्लक्षित
आकोट : संपूर्ण राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरविण्यात येणार्या तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती राहावी आणि त्यांच्या मध्यान्ह भोजनाची सोय व्हावी, या दुहेरी हेतूने शासनाने शालेय पोषण आहाराची योजना कार्यान्वित केली. त्यासाठी भोजनाचे प्रमाण निश्चित करून प्रत्येक शाळेला तांदूळ तथा खिचडीकरिता लागणारे मसाल्याचे पदार्थ पुरवण्यात येतात. यामधील महत्त्वाचा घटक असलेला तांदूळ गोणपाटाच्या कट्टय़ात ५0 किलोच्या प्रमाणात पुरवण्यात येतो. यातील तांदूळ तथा अन्य किराणा मालाचा कागदोपत्री नीट हिशेब ठेवल्या जातो. त्यासाठी साठा पुस्तिकेत प्रत्येक वाणासाठी कॉलम आहेत; परंतु बारदाना जमा करण्याबाबत कुठेच उल्लेख नाही. परिणामी गोणपाटाच्या या कट्टय़ांचा हिशेब कुठेच ठेवल्या जात नाही. हा प्रकार अगदी योजना सुरू झाल्यापासूनच सुरू आहे. शासनानेही या बाबीकडे समूळ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे किमान ८ वर्षांंपासून या बारदान्याचे लाखो कट्टे गहाळ झालेले आहेत. बाजारात या खाली कट्टय़ांची किंमत १४ ते १६ रुपये आहे. बाजार भावाचा हा संदर्भ घेतल्यास आजवर शासनाचे करोडो रुपये मातीत गेले असल्याचे दिसून येते. शासनच विचारीत नाही म्हणून तर अधिकारी हिशेब मागीत नाही म्हणून खिचडीवाले शिक्षक या बारदान्याबाबत उदासीन आहेत; परंतु यातील काही बेरकी लोकांनी मात्र बारदान्याचे महत्त्व ओळखून हा बारदाना हातोहात लंपास केला आहे. काही शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा प्रयास केला; परंतु जेथे विद्यार्थ्यांनाच बसण्यास वर्ग खोल्यांची मारामार आहे, तेथे बारदान्यासाठी एक संपूर्ण वर्गखोली का गुंतवून ठेवावी, हा सुज्ञ विचार करून त्या शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा विचार त्यागला. जो बारदाना गोळा केला तो पायपुसणी म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या पायदळी तुडविल्या गेला. यातून जो बारदाना वाचवला त्यावर उंदरांनी ताव मारून निरुपयोगी करून टाकला आहे. संपूर्ण राज्यातील शाळांमधून हा बारदाना बाजारात आणला असता, तर त्यापोटी शासनास करोडोचा लाभ झाला असता; परंतु शासन, अधिकारी तथा शिक्षकांच्या उदासीन धोरणाने करोडो रुपयांच्या बारदान्याची पुरती वाट लागली आहे. हा बारदाना सुरक्षित राहून त्यावर महसूल प्राप्त करण्यासाठी तांदूळ व किराणा मालासोबतच बारदान्याचा हिशेब ठेवणे अतिशय गरजेचे आहे. त्यासोबतच दरमहा गोळा केलेला बारदाना संकलित करून शासनानेच त्याच्या साठवणुकीची तथा सुरक्षेची हमी घेणे, हे शासनाच्या आर्थिक हिताचे आहे.