‘समृद्धी’च्या दर्जाला तडे, पुलाचा स्लॅब पडला, माळीवाडा इंटरचेंजवरील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह
By विकास राऊत | Updated: June 11, 2025 09:37 IST2025-06-11T09:37:25+5:302025-06-11T09:37:43+5:30
Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील (माळीवाडा इंटरचेंज) वरील पुलाचा स्लॅब पडल्याने कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे धिंडवडे निघाले आहेत.

‘समृद्धी’च्या दर्जाला तडे, पुलाचा स्लॅब पडला, माळीवाडा इंटरचेंजवरील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर - समृद्धी महामार्गावरील (माळीवाडा इंटरचेंज) वरील पुलाचा स्लॅब पडल्याने कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे धिंडवडे निघाले आहेत. अडीच वर्षांत ३ वेळा महामार्गावरील सरफेस, पूल, एक्सपान्शन जॉइंटच्या कामाच्या दुरुस्तीवरून यंत्रणेच्या कामाच्या ‘दर्जा’ची प्रतिष्ठा मातीत मिळाली आहे.
२ हजार कोटींतून ५४ कि.मी. अंतराचे काम मेघा इंजिनिअरिंग या कंत्राटदाराने, तर ५६ कि.मी.चे काम ‘एल ॲण्ड टी’ या संस्थेने केले आहे. बेंबेवाडी ते फातियाबाद मेघा व त्यापुढे सुरालापर्यंत एल ॲण्ड टीने काम केले आहे.
मेघा इंजिनिअरिंगच्या अखत्यारीत महामार्गाच्या पुलावरील स्लॅब पडणे, काँक्रिटला तडे जाणे, जॉइंट दुरुस्तीचे काम करावे लागत असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ष २०२६ पर्यंत सदरील कंपनीचा डीएलपी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) आहे. या काळात महामार्गाच्या डागडुजीची जबाबदारी या कंत्राटदार संस्थांची आहे.
विनापडताळणी बोलणे अशक्य
कंत्राटदाराच्या जबाबदारीवर व खर्चाने दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले आहे. महामार्गाच्या कामात अनेक तज्ज्ञ संस्था सहभागी होत्या. सध्या ज्या अडचणी आहेत, त्याची तपासणी होत नाही, तोपर्यंत गुणवत्तेबाबत बोलता येणे शक्य नाही, असे एमएसआरडीसीचे अभियंता सुरेश जोशी यांनी सांगितले.