CoronaVirus News: ...तर पुन्हा कठोर लॉकडाऊन; 'पुनश्च हरीओम'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 16:54 IST2020-06-10T16:32:26+5:302020-06-10T16:54:20+5:30
CoronaVirus News: 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत दिलेल्या सवलतींनंतर नागरिकांची रस्त्यावर झुंबड

CoronaVirus News: ...तर पुन्हा कठोर लॉकडाऊन; 'पुनश्च हरीओम'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
मुंबई: आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं असल्यानं लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येत आहे. काही गोष्टी अंगवळणी पडायला हव्यात यासाठी निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुनश्च हरिओम म्हणून आपण काही सवलती दिल्या. मात्र त्या देताच सगळ्यांचीच रस्त्यावर झुंबड उडाली. सरकार देत असलेली ही उघडीप जीवघेणी ठरत असल्यास पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
आपल्याला कोरोनासोबत अतिशय सावध राहून जगावं लागणार आहे. त्यामुळेच सरकार अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. आपण कोणतीही घाई करत नाही. टप्प्याटप्प्यानं आपण लॉकडाऊन लागू केला. आता टप्प्याटप्प्यानं आपण निर्बंध शिथिल करत आहोत. सकाळी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र ही सवलत देताच रस्त्यांवर गर्दी झाली. ही गर्दी टाळायला हवी. जर लोकांनी गर्दी करणं कमी केलं नाही, जी शिथिलता आहे त्यातून नुकसान होत आहे हे लक्षात आलं तर नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्राकडे लोकलची मागणी केली आहे. लोकलसेवा सुरू नसल्यानं रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जाता येत नाही. लोकलसेवा सुरू झाल्यास त्यांना रुग्णालयात जाणं शक्य होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकात आढळून आला. त्याबद्दल प्रश्न विचारला असता, सरकार कोरोनाविरुद्धची लढाई गांभीर्यानं लढत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सरकार गंभीर नसतं, तर देशातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या नसत्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं.
कोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा
अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस
‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती