Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:29 IST2020-04-20T19:43:46+5:302020-04-20T21:29:16+5:30
पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार?
मुंबई- देशावर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला असतानाच राज्य सरकारकडून त्याला थोपवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. ठाकरे सरकारनं कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात नियमावलीच लागू केली आहे. काही प्रमाणात ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यांना सूट दिली असली तरी जिल्हाबंदीच कायमच आहे. परंतु या कोरोनाच्या काळात पालघरच्या घटनेनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. पालघर जिल्ह्यातील एका गावात दोन साधू आणि एका चालकाच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता शरद पवार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असून, पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
शरद पवारांच्या भूमिकेला ठाकरे सरकारमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गेल्या वेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी वांद्र्यातल्या प्रकारावर भाष्य केलं होतं. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असला तरी त्यांच्या प्रवासाची सोय करू शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार, सेवाभावी संस्थांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 3 मेपर्यंत संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकार धीराने काम करत आहे, योग्य नियोजन करून कोरोनाचा सामना करणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी असल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योग बंद असून, अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे.
एवढंच नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले होते. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.' कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असा सल्लाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला दिला होता.कोवीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्याशी संवाद साधणार आहे. #LetsFightCoronaTogether#COVID19#CoronaVirus#FacebookLive#WarAgainstViruspic.twitter.com/abnSSsVCGG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 20, 2020