CoronaVirus News: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? सरकारच्या भूमिकेबद्दल आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 09:47 IST2022-01-29T09:46:05+5:302022-01-29T09:47:43+5:30
CoronaVirus News: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितली महाविकास आघाडी सरकारची भूमिका

CoronaVirus News: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? सरकारच्या भूमिकेबद्दल आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची चर्चा सुरू झाली. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चादेखील झाली. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का, तशी घोषणी राज्य सरकार करणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. यावर आता कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका. मास्क हे कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगलं हत्यार असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास तरी महाराष्ट्र मास्कमुक्त होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
मास्क, महाराष्ट्र अन् कॅबिनेटमधील चर्चा
गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबद्दल चर्चा झाली. कोरोना रुग्णांची घटलेली संख्या, लसीकरणात होणारी वाढ यांचा विचार करून महाराष्ट्राला मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. मास्कमुक्तीचा निर्णय घेणाऱ्या देशातील परिस्थिती पाहिली जाईल, तिथल्या स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. टास्क फोर्सशी चर्चा करून याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल अशीही शक्यता वर्तवली जात होती.