CoronaVirus News: 'त्या' जिल्ह्यानं वाढवली महाराष्ट्राची चिंता; रुग्णसंख्येत घट; पण मृत्युसत्र थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:48 IST2021-05-31T08:48:17+5:302021-05-31T08:48:40+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. मात्र, तीन महिन्यांपासून दररोज १५ ते २५ रुग्णांचा मृत्यू होत आहे

CoronaVirus News death rate of aurangabad is more than state | CoronaVirus News: 'त्या' जिल्ह्यानं वाढवली महाराष्ट्राची चिंता; रुग्णसंख्येत घट; पण मृत्युसत्र थांबेना

CoronaVirus News: 'त्या' जिल्ह्यानं वाढवली महाराष्ट्राची चिंता; रुग्णसंख्येत घट; पण मृत्युसत्र थांबेना

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. मात्र, तीन महिन्यांपासून दररोज १५ ते २५ रुग्णांचा मृत्यू होत असून, मृत्यूसत्र काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. या सगळ्यात राज्यापेक्षा औरंगाबादेत कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत महिनाभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आलेख कमालीचा घसरला आहे. रोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत होते. परंतु, आता ही संख्या तीनशेखाली आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरू आहे. 

औरंगाबादेत शनिवारी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर थेट १०.०८ टक्के राहिला. या सगळ्या परिस्थितीमुळे औरंगाबादेतील मृत्यूदर हा राज्यापेक्षा अधिक झाला. मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. रुग्णांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यावर आजार अंगावर काढता कामा नये; परंतु अनेक रुग्ण उपचारांसाठी वेळीच दाखल होत नाहीत. तीव्र लक्षणे दिसत असतानाही त्रास सहन केला जातो. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठले जाते. अशा परिस्थितीत मृत्यूचा धोका वाढतो. लक्षणे दिसल्यावर वेळीच रुग्णालयात दाखल झाल्यास कोरोनामुक्त होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

शहरापेक्षा ग्रामीण भागाचा मृत्यूदर अधिक
शहरापेक्षा ग्रामीण भागाचा मृत्यूदर अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत ग्रामीण भागांतील रुग्णांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी थेट शहरात येण्याची वेळ ओढावत आहे.

औरंगाबादचा दैनंदिन मृत्यूदर
२३ मे - ६.१० टक्के
२४ मे - ५.२१ टक्के
२५ मे - ३.५३ टक्के
२६ मे - ५.३४ टक्के
२७ मे - ४.०१ टक्के
२८ मे - ५.८२ टक्के
२९ मे - १०.०८ टक्के

Web Title: CoronaVirus News death rate of aurangabad is more than state