CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ६३,७२९ कोरोना रूग्ण, तर मुंबईत ८,२१७ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:48 IST2021-04-17T01:33:41+5:302021-04-17T06:48:17+5:30
CoronaVirus News : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे.

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ६३,७२९ कोरोना रूग्ण, तर मुंबईत ८,२१७ रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचे आकडे वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात ६३ हजार ७२९ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर, ३९८ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे. शुक्रवारी राज्यात ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे. तर, एकूण ६ लाख ३८ हजार ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.१२ टक्क्यांवर आले आहे. आज ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ काेरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५९ हजार ५५१ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७ लाख ३ हजार ५८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत शुक्रवारी ८,२१७ रुग्ण, ४९ मृत्यू
शुक्रवारी मुंबईत ८,२१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात तब्बल १० हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, मृत्यूच्या आकड्यात वाढ झाली असून, ४९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सक्रिय रुग्णांचा आकडा ८५ हजार ४९४ इतका आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार ३९ रुग्ण
कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी पाच हजार ३९ झाली आहे. ९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात चार लाख सहा हजार ९३ रुग्णसंख्या असून, सहा हजार ८६४ मृत्यूंची नोंद झाली आहे. ठाणे शहरात एक हजार ४१० रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ४३७ रुग्ण आढळले असून, पाच मृत्यू झाले.उल्हासनगरला १५७ रुग्ण सापडले भिवंडीला ५५ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू आहे. मीरा-भाईंदरला ४६२ रुग्ण सापडले असून, नऊ मृत्यू झाले आहेत. अंबरनाथ शहरात १४० रुग्ण सापडले असून, तीन मृत्यू झाले. बदलापूरमध्ये २११ रुग्ण सापडले आहेत.