- वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात गत विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला निवडणूकीपूर्वीच खिंडार पडू लागल्याने आघाडीच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्या तुलनेने या परिस्थितीचा पुरेपूर लाभ भाजप उठवित असून, अनेकजण काँग्रेस आघाडीला सोडण्याचा निर्णय घेत आहेत.
सहकार चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रावर सतत वर्चस्व ठेवून असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मोठा धक्का दिला. भाजपने ५८ पैकी एकवीस जागा जिंकल्या होत्या. पुणे जिल्ह्यातच या पक्षाला तेरा जागा मिळाल्या होत्या. त्यात पुणे शहराचा सिंहाचा वाटा होता. (आठपैकी आठ जागा जिंकल्या.) मात्र, सातारा या एकमेव जिल्ह्यातून भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. सोलापूर आणि कोल्हापुरातून प्रत्येकी दोन, तर सांगलीतून चार जागा मिळाल्या. शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यातून सहा जागांसह एकूण तेरा जागा पश्चिम महाराष्ट्रात जिंकल्या. या दोन्ही पक्षांच्या युतीकडे ३४ आमदार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात केवळ आठ मतदारसंघांत काँग्रेस आघाडीकडे सक्षम उमेदवार नाहीत. याउलट भाजप-शिवसेनेवर लढण्यासाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेकांचा प्रवेश चालू आहे. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिवेंद्रराजे भोसले, श्यामल बागल, आदींनी पक्ष सोडला आहे. माजी खासदार धनंजय महाडिक, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा आहे.
काँग्रेसमधून माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, माजी आमदार दिलीप माने, सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले आदींनी पक्षांतर केले आहे. काँग्रेसची अवस्था आणखीन केविलवाणी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गत निवडणुकीत स्वतंत्र लढवूनही सर्व जिल्ह्यात यश मिळविले आणि सोळा जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ सातच जागा मिळाल्या. त्यात पुण्यात एकच जागा मिळाली. (भोरचे संग्राम थोपटे, सांगली जिल्ह्यात डॉ. पतंगराव कदम यांचा एकमेव विजय होता.) कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.