Nana Patole : “राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:43 IST2025-05-26T15:42:51+5:302025-05-26T15:43:31+5:30

Nana Patole : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Congress Nana Patole Slams maharashtra government over Mumbai Rain | Nana Patole : “राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole : “राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

“राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं आहे – शब्दशः आणि कार्यक्षमतेनेही!” असं म्हणत पटोले यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “महायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही” असं म्हटलं आहे. नाना पटोले यांनी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. 

“निसर्गाचा इशारा, सरकारचा बेशिस्त कारभार! राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं आहे – शब्दशः आणि कार्यक्षमतेनेही! मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे.”

“अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचे भयानक नुकसान झालं आहे. मात्र सरकारकडून फक्त आकडेवारी वाचली जाते, मदतीचा एक थेंबही शेतकऱ्याच्या डोळ्यांतले अश्रू थोपवू शकलेला नाही. मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अजूनही हवेत लोंबकळतेय, आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेतकऱ्याला निवडणुकांच्या वेळी "राजा" म्हणणारेच आज त्याच्या दुःखाकडे पाठ फिरवत आहेत. आणि म्हणूनच, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नुसती नैसर्गिक आपत्ती नाही – ती एक चेतावणी आहे!”

"फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते"

“महायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही. रस्ते चांगले करू शकत नाहीत.  ड्रेनेज सिस्टिम सुधारू शकत नाही. नद्यांमधील कचरा काढण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये लुटले जातात हे विदारक दृश्य आहे. गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुका सरकारने घेतल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाला सरकारला चार महिन्यात निवडणुका घ्यायला सांगावे लागते. पण या सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही. प्रशासक आणि सरकारच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे.”

" सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही"

“अजित पवार अनेक वर्षं पुण्याचे पालकमंत्री होते. तरीही शहरात असा पूर येतो की नद्या रस्त्यांवरून वाहतात? हे निष्काळजी नियोजन नाही, तर बिल्डर लॉबीसोबतच्या संगनमताचं फलित आहे. सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही. यामुळेच आज राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. आज एकीकडे पुराने राज्याला वेढले आहे, एकीकडे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली आहे आणि दुसरीकडे अमित शहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी नांदेड मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ यांना जनतेच्या मतावर ऐशोआराम करायचा आहे.”

“राहुलजींनी ज्याप्रमाणे ओबीसी समुदायाबद्दल आणि जातीनिहाय जनगणनेबद्दल भूमिका मांडली ती या देशात कुणीही मांडलेली नाही. ओबीसी समाजाचा खरा लढवय्या नेता राहुलजी गांधी आहेत. तेलंगणा राज्याने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना केली, त्या धर्तीवर संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.”

"ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सुरक्षा का पुरवण्यात आली नाही?"

“आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाला सलाम करण्याऐवजी मीच युद्ध जिंकले आहे असे भासवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. आपली पाठ आपल्या हाताने थोपटण्याच काम नरेंद्र मोदी करत आहेत. ज्या आमच्या भगिनीचा कुंकू पुसण्याचं पाप आतंकवाद्यांनी केलं ते आतंकवादी कुठे आहेत? ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आहेत, म्हणून मिलिटरीचे कपडे घालून स्वतःच स्वतःची पाठ थोपटायची जी भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली आहे तिचा आम्ही निषेध करतो” असं नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: Congress Nana Patole Slams maharashtra government over Mumbai Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.