“भाजपला ५० खासदार कमी पडतील, मोदी नाही गडकरींना पंतप्रधानपदाची संधी”; काँग्रेसचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 11:17 IST2023-09-04T11:13:42+5:302023-09-04T11:17:53+5:30
Nana Patole News: सरकार शासन आपल्या दारी माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“भाजपला ५० खासदार कमी पडतील, मोदी नाही गडकरींना पंतप्रधानपदाची संधी”; काँग्रेसचा मोठा दावा
Nana Patole News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. विविध पक्षाचे नेते राज्यभरात दौरे करत आहेत. यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढताना दिसत आहेत. यातच काँग्रेसकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ५० खासदार कमी पडतील. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याऐवजी नितीन गडकरी यांच्या पंतप्रधानपदाच्या संधी वाढतील, असा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सभेला संबोधित केले. भाजपमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, पूर्वी गडकरी काय बोलायचे आणि आता काय बोलत आहेत, हे बारकाईने पाहा. पूर्वी गडकरी म्हणायचे तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन, गडकरी यांच्या अशाच घोषणा होत्या. पण आता संधी दिसताच गडकरी सरसावले आहेत. ५० खासदार कमी पडले तर नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते, असे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्या वाद सुरू झाला, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला. तसेच डिसेंबरमध्ये सर्व्हे होईल तेव्हा भाजपचा आकडा पुन्हा खाली येईल, असेही नाना पटोले म्हणाले.
मतविभाजनामुळे आपण हरलो होतो
आता मशिनबिशिन काही कामी येणार नाही. आपल्या मतविभाजनामुळे आपण हरलो होतो. लोकशाहीची थट्टा चालवली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. जालन्यात जो लाठीचार्ज झाला तो अमानुष होता. पेटलेला वणवा सरकारने थांबवला पाहिजे नाही तर जनता वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने माफी मागितली पाहिजे. राज्यात दुष्काळचे परिस्थिती आहे आणि सरकार शासन आपल्या दारी माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. स्वत;च्या हाताने आपली पाठ थोपटत आहे, या शब्दांत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, येत्या डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली हे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे आव्हान पेलण्यासाठी भाजपला एनडीएचे पुनरुज्जीवन करावे लागल्याचे म्हटले जात आहे.