शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:02 IST2025-06-06T06:01:20+5:302025-06-06T06:02:42+5:30
ऑनलाइन झालेल्या या परीक्षेत अनेक केंद्रांवर अनेक वेळा संगणकच बंद पडले.

शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पदासाठी आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेत (टीएआयटी) विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑनलाइन झालेल्या या परीक्षेत अनेक केंद्रांवर अनेक वेळा संगणकच बंद पडले. संगणक सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींना प्रश्न पुन्हा सोडवावे लागले. त्यात त्यांचा बराच वेळ गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याशिवाय अनेक जिल्ह्यांत १४० पेक्षा अधिक विवाहितांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारही परीक्षार्थींनी केली आहे.
अडीच लाखांहून जास्त उमेदवार
२४ मे ते ५ जूनदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. तीन वर्षांनंतर ही परीक्षा होत असल्याने परीक्षार्थींना खूप आशा आहेत. परंतु, चांगली तयारी करूनही तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना पेपर पूर्ण सोडविता आला नाही. अनेक केंद्रांवर अचानक संगणक बंद झाले. संगणक पुन्हा सुरू झाल्यावर सोडविलेले काही प्रश्न पुन्हा सोडवावे लागले. त्यात वेळ गेल्याचे एका परीक्षार्थीने सांगितले.
जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. उमेदवारांनी निवडलेला जिल्हा सोडून मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर परीक्षा झाली. या सर्व प्रकारात उमेदवारांचे नुकसान झाले असून, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष तुषार देशमुख तसेच परीक्षार्थींनी परीक्षा परिषद तसेच नेमलेल्या परीक्षा केंद्रांकडे केली आहे.
विवाहित महिलांच्या पॅन कार्डवर दोन्हीकडील नावाचा उल्लेख असतो, ते सादर करूनही त्यांना परीक्षेस बसू दिले नाही. सोबत तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला.
-महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
अनेक परीक्षा केंद्रांवर संगणकात तांत्रिक बिघाड झाल्याचे अनेकांनी कळविले. छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील सर्वांत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या.
-प्रशांत शिरगुर, उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना
माझी परीक्षा ज्या केंद्रावर पार पडली तिथे अनेक वेळा संगणक बंद पडत होता, त्यामुळे पुढील वेळेचेही नियोजन करता आले नाही.
-सोनाली वडे, परीक्षार्थी