वसई/पारोळ : कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक व आंबा उत्पादक यांनी आमदार निवासाच्या मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोकणातील आमदार यांच्या उपस्थित पर्यटन वर्धापन दिन साजरा केला. त्यावेळी वसई परिसरात पर्यटनाचा विकास केल्याबाबत वसईचे महादेव निजाई यांचा सत्कार करण्यात आला.वसई तालुक्यात अर्नाळा, कळंब, नवापूर, गावातील सरकारी जमीनीवरील अतिक्रमणाबाबत निवेदन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आले. त्यामध्ये नवापूर व कळंब या गावातील स्थानिक भूमीपुत्रांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून १०० ते १५० वर्षापासून जी जमीन आपल्या ताब्यात ठेवली आहे. व त्यावर त्यांनी आता पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना त्या जमिनीचे हक्क शासनाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. जर सरकारी जमिनीवरील सन २००० पूर्वीची अतिक्रमणे व बांधकामे कायदेशीर केली जाऊ शकतात तर कळंब, नवापूर, अर्नाळा येथील सरकारी जागेवरील बांधकामे कायदेशीर करण्यात कोणती अडचण आहे, वसईचा पर्यटन विकास साधायचा असेल सरकारने हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे निजाई यांनी लोकमतला सांगितले.कोकणाला ७५२ किमीचा समुद्रकिनारा लाभला असला तरी गोवा व केरळच्या मानाने महाराष्ट्राचे पर्यटनक्षेत्रातील उत्पन्न कमी आहे. वसईला लाभलेला समुद्रकिनारा, इतिहासातील स्थळे, सागरी किल्ले, धार्मिक स्थळे यामुळे सरकारने पर्यटन व्यवसायीकांच्या मागण्या मान्य केल्यास वसईत पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येतील. असा दावा यावेळी करण्यात आला. (वार्ताहर)
वसईतील पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे
By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST