Eknath Shinde: राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची नुकतीच घोषणा झाली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. कारण या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर काही मंत्र्यांचा समावेश असलेल्या या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने त्यांना डावललं जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर उलट-सुलट चर्चा रंगू लागल्याने आता राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन समिती निवडीच्या निकषांमध्ये बदल करत या समितीत शिंदे यांना समाविष्ट केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीत यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह वित्त, महसूल, गृह, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यासह मदत आणि पुनर्वसन या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असत. परंतु आता नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही सदर समितीत समाविष्ट करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचे समजते.
शिंदेंची नाराजी आणि तर्क-वितर्क
आधी मुख्यमंत्रिपद, नंतर काही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आणि आता आपत्ती व्यवस्थापन समितीवरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षामुळे एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. तसंच शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना सुरू केलेल्या काही लोकप्रिय योजनांनाही आता सरकारकडून कात्री लावण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदे यांचे पंख छाटण्याचे काम सुरू आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.