Deputy CM Eknath Shinde News: बैलगाडा शर्यतींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला अक्षरशः नवं बळ दिलं आहे. एकेकाळी ५० हजार रुपयांचा बैल आज ३ कोटीपर्यंत विकला जातो, तर या शर्यतींची उलाढाल तब्बल १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. लवकरच हा आकडा ५०० ते १००० कोटींपर्यंत जाणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी आयोजकांच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाखांची मदत उपमुख्यमंत्री शिंदे यांना सुपूर्द करण्यात आली.
बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचं नवं इंजिन आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या गोधनावरील प्रेमाचं आणि गावागावांतील एकतेचं हे जिवंत प्रतीक आहे. या शर्यतीमुळे गावागावात नवा रोजगार निर्माण झाला आहे. बैल प्रशिक्षण केंद्र, शर्यतींसाठीचे मैदान, खाद्य व औषध व्यवसाय, तसेच वाहन व सजावटीच्या वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी, ग्रामीण भागात शेकडो कोटींची उलाढाल सुरू झाली असून, शेतकऱ्यांसाठी हे एक नवीन उत्पन्नाचं साधन बनलं आहे. बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सरकार तिचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्या सरकारचे योगदान महत्त्वाचं ठरलं
पूर्वी न्यायालयीन बंदीमुळे थांबलेल्या या परंपरेला पुन्हा नवसंजीवनी मिळवून देण्यात आमच्या सरकारचे योगदान महत्त्वाचं ठरलं आहे. आता शर्यतींचा दर्जा वाढवून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. जसं हॉर्स पोलो खेळ जगभर पोचला, तसं बैलगाडा शर्यतींचंही ब्रँडिंग आपण करणार आहोत. स्पेन, इटली, रशिया अशा देशांतही महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यती दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या श्रीनाथ केसरी शर्यतीत देशभरातून अडीच हजार चालकांनी सहभाग घेतला. तब्बल ५ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मैदान अक्षरशः दणाणून गेलं. विजेत्यांसाठी दोन फॉर्च्युनर, दोन थार, सात ट्रॅक्टर आणि १५० टू-व्हीलर अशी बक्षिसांची लयलूट होती. महिलांसाठी स्वतंत्र शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आणि १०० गाईंचं वाटप करण्यात आलं.
Web Summary : Bullock cart races revitalize Maharashtra's rural economy, generating significant revenue and employment. Deputy CM Shinde highlights the government's commitment to preserving this tradition, aiming for international recognition and increased opportunities for farmers.
Web Summary : बैलगाड़ी दौड़ ने महाराष्ट्र की ग्रामीण अर्थव्यवस्था को पुनर्जीवित किया, जिससे राजस्व और रोजगार उत्पन्न हुआ। उपमुख्यमंत्री शिंदे ने इस परंपरा को संरक्षित करने की सरकार की प्रतिबद्धता पर प्रकाश डाला, जिसका लक्ष्य किसानों के लिए अंतर्राष्ट्रीय पहचान और अवसर बढ़ाना है।