“गढूळ पाण्यात कपडे धुणे म्हणजे राजकारण, काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात”: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 13:24 IST2025-02-02T13:22:52+5:302025-02-02T13:24:28+5:30
BJP Pankaja Munde News: कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेम लाभले आहे. तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? असा विचार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला.

“गढूळ पाण्यात कपडे धुणे म्हणजे राजकारण, काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात”: पंकजा मुंडे
BJP Pankaja Munde News: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधक महायुती सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही, तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन धनुष्यबाण याबाबत अनेक दावे शिंदेसेनेकडून केले जात आहेत. अनेक आमदार, खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचेही दावे केले जात आहेत. यातच भाजपा नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
जालना येथे पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपले नाव ओढतात. तर, तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे, असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार?
कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेम लाभले आहे. मला कायमच हे वाटते की, तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? मला टेन्शन येते. मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात. माझे कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे, तुम्हीही करता. बाकी कुणी केले नाही. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का? कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले माझे काही काम नाही, ही माझी शेवटची निवडणूक. मी त्यांना विचारले असे का म्हणता? तर म्हणाले समाज ज्या हातांमध्ये द्यायचा आहे ते हात तयार झाले. मी पुढची निवडणूक लढणार नाही असे गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.
दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजय मुंडेंकडे केला नाही. स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेले आहे , यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजितदादांचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सातत्याने होत असलेल्या मागणीवर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.