BJP MP Ashok Chavan News: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला पडत असलेले खिंडार दिवसेंदिवस मोठे होताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. यातच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
सांगलीच्या राजकारणात दिवंगत मदन पाटील यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. काँग्रेसअंतर्गत आतापर्यंत हा गट सक्रिय होता. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या, जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदन पाटील यांचा गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपाच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपामध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. या घडामोडींबाबत पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता, काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे
पत्रकारांशी बोलताना भाजपा खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची अवस्था अशी आहे की, हा केवळ नात्यागोत्यांचा पक्ष राहिलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम असले, तरी नुसते टीका-टिप्पणीवर राज्य चालत नसते. कष्टही करावे लागतात. राज्याच्या प्रगतीचा पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो. टीम सोबत घेऊन उत्साहाने काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने कोणतीच बाब महाराष्ट्रात होताना दिसत नाही. स्वाभाविक आहे की, लोक किती दिवस वाट पाहतील. सांगलीत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्याचे प्रमुख कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडणारच, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. भाजपाबरोबर जाणे म्हणजे अनैसर्गिक युती ठरणार असल्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी केले. दिवंगत नेते मदन पाटील यांनीही १९९९ मध्ये राष्ट्रवादी आणि दिवंगत नेते संभाजी पवार यांच्याशी युती केली होती; पण, सांगलीकरांनी या युतीला झिडकारले होते. या निवडणुकीत मदनभाऊ यांचा पराभव झाला होता. म्हणून जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये. सांगलीकरांना हा निर्णय रुचणार नाही. म्हणून जयश्रीताई यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय रद्द करण्याची गरज आहे, असेही विशाल पाटील यांनी म्हटले आहे.