BJP vs Nana Patole on Operation Sindoor Controversial statement: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. २६ निष्पाप हिंदू पुरुषांची हत्या करण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यावरून संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. पण याचदरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र एक असंवेदनशील विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा व्हिडीओ गेम असा पटोले यांनी उल्लेख केला. त्यांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला.
"ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?" असा खरमरीत सवाल बावनकुळेंनी केला.
"नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे," असे ट्विट त्यांनी केले.
नाना पटोले काय म्हणाले होते?
"भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात एक वक्तव्य केले. त्यावरून असे स्पष्ट होत आहे की, भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरबाबत पूर्वकल्पना दिली. तसेच तुमच्या लोकांना तिथून हटवा, असे सांगण्यात आले. याचा अर्थ असा की, लहान मुले कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला," असे नाना पटोले म्हणाले होते. त्यावरून आता राजकारण पेटले आहे.