लाडकी बहीण : वाढीचा विचार अधिवेशनावेळी, देवेंद्र फडणवीस यांची पत्रपरिषदेत ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 07:52 IST2024-12-06T07:51:49+5:302024-12-06T07:52:39+5:30
लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल, निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पहिल्या पत्रपरिषदेत सांगितले.

लाडकी बहीण : वाढीचा विचार अधिवेशनावेळी, देवेंद्र फडणवीस यांची पत्रपरिषदेत ग्वाही
मुंबई : लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल, निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पहिल्या पत्रपरिषदेत सांगितले. कोणावरही अन्याय केला जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच त्यांनी या योजनेतील मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी (एप्रिल) केला जाईल, असे स्पष्ट केले.
शेतकरी सन्मान निधी योजनेत काही शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत दिली गेली, असे लक्षात आले होते. त्यावर कार्यवाही करून निर्णय घेण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेत निकषात बसत नसतानाही मानधन दिले जात असल्याचे छाननीत लक्षात आले तर पुनर्विचार करू असे ते म्हणाले.
मोठ्या उद्योगांची लवकरच घोषणा
जनतेला लवकरच मोठी गुंतवणूक येणार असल्याची बातमी मिळेल. मोठ्या कंपन्यांशी माझी या गुंतवणुकीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. परकीय गुंतवणुकीबाबत राज्य पहिल्या क्रमांकावरच ठेवण्याचे उद्दिष्ट असेल ते म्हणाले.
टेस्ट मॅच खेळायची आहे शिंदे आणि मी असे सरकार होते तेव्हा वनडे खेळायची होती, अजितदादा सोबत आले तेव्हा टी-२० खेळायची होती. आता पाच वर्षे हाताशी आहेत. आज मंत्रालयात आल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आता आपल्याला टेस्ट मॅच खेळायची आहे. योग्यरीत्या निर्णय घेत पुढे जायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
भूमिका बदलली तरी आमची दिशा, गती, समन्वय तोच महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी भूमिका आमच्यात बदलली असली तरी आधीच्या सरकारमध्ये असलेली दिशा, गती आणि समन्वय राज्याला पुन्हा दिसेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
महायुती सरकारने घेतलेले लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण पुढेही चालू राहील. दुष्काळमुक्त महाराष्ट्राला आमचे प्राधान्य असेल. लोकाभिमुख सरकार आम्ही देऊ. विरोधी पक्षांना सन्मान देऊ, त्यांचा आवाज दाबणार नाही. बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करू, असे ते म्हणाले.
जातजनगणनेला विरोध नाही
जातनिहाय जनगणना करण्यास भाजपचा विरोध नाही; पण या जनगणनेचा शस्र म्हणून वापर होता कामा नये. तसेच मायक्रो ओबीसी जातींवर त्यामुळे अन्यायही होता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे फडणवीस म्हणाले.
शिंदे नाराज नाहीत
एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या वृत्ताचा फडणवीस यांनी इन्कार केला. मी त्यांना विनंती केल्यानंतर मंत्रिमंडळात येण्याचे त्यांनी तत्काळ मान्य केले. त्यांच्या नाराजीच्या बातम्या केवळ माध्यमांमध्ये होत्या, असे ते म्हणाले.