“बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:10 IST2025-01-28T16:09:53+5:302025-01-28T16:10:33+5:30
Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

“बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख
Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनीही सातत्याने ही मागणी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे वळवला असून, आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बीडचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने सहभाग घेत मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे यांच्यासोबत अनेकांनी त्यांच्या आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे. मनोज जरांगे यांच्यासह अनेकांची प्रकृती तिसऱ्या दिवशी खालावली आहे. बीड प्रकरणात सक्रीय असलेल्या मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवाली सराटी येथे गेले आहेत. यासह संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही आमरण उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतील. दादा केवळ आमच्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबाचा भाग आहेत. आम्ही दादांना काही होऊ देणार नाही. माझे वडील तर गेले, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. पण दादांना आम्ही काही होऊ देणार नाही. माझ्या वडिलांना न्याय मिळावा आणि दादांच्या आरक्षणासाठीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. दादांची तब्येत खूप खालावली आहे. त्यांना बोलतानाही येत नाही. आमच्या आज्जीने त्यांना आग्रह केल्यानंतर त्यांनी एक घोट पाणी प्यायले. आताही ते सलाइनसाठी नकार देत आहेत, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आरक्षण मिळायला हवे. आम्ही दादांना काही होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या. कारण दादांची तब्येत खूप बिघडत आहे, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.