ऑनलाइन टीम
कणकवली, दि. १८ - बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धव ठाकरेनेच केलाय असं खळबळजनक एकेरी विधान नारायण राणे यांनी केलं असून जुने नेते, जुने शिवसैनिक, नोकर सगळ्यांना हे माहित आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी राणेंवर केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेनं परत माझ्यावर टीका केली तर त्याचं आणखी वस्त्रहरण करू असं सांगत माझ्या नादी लागू नये असं राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वगुण नसून लोकसभेत शिवसेनेचे १७ खासदार केवळ मोदीकृपेमुळे निवडूण आल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरेंना कोकणाच्या कुठल्याही प्रश्नांची जाणीव नसल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरेंच्या मर्दपणावरही त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवतात. जो खरा मर्द असतो तो दर दोन महिन्यांनी स्वत:ला मर्द म्हणवत नाही असे सांगत, संशय असेल तोच माणूस असा करतो असं ते म्हणाले.
उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा सोमवारी राणे देणार असले तरी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या राजीनाम्याची सगळी कारणं आपण सोमवारीच सांगू असंही ते म्हणाले. हायकंमाडवर आपण कधीही टीका करणार नसलो तरी काँग्रेसमध्ये निष्ठावान नेते,कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय असं राणे म्हणाले. कोकणात दहशत आहे असं जो शिवसेनेकडून कांगावा होतोय तो चुकीचा असून कोकणी माणसाच्या सुख-दुखात उध्दवचं योगदान काय आहे असा प्रश्न राणे यांनी विचारला. माझ्यावर टीका करण्याचा उध्दव ठाकरे यांना नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा माझ्यावर टीका करू नये, नसता त्यांचे वस्त्रहरण मी करेल असे राणे यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांनी जनतेचे प्रश्न आधी समजून घ्यावे नंतर मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहावे असा चिमटाही राणे यांनी काढला.
भाजपा दिलेला शब्द पाळत नाही हे जनतेला माहित झाले असून देशातला मोदी फॅक्टर आता संपला असल्याचे राणे म्हणाले. सिंधुदुर्गात मुलावर दगडफेक कोणी केली हे पाहण्यासाठीच मी आलो असल्याचे राणे म्हणाले.