Ajit Pawar On Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा कृषीमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचे कान टोचले हेत.
अजित पवार काय म्हणाले?मीडियाशी बोलताना अजित पवार म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, शेतकऱ्यांच्या बाबतीत अशाप्रकारची वक्तव्ये टाळा. शेतकरी आपला बळीराजा आहे, लाखांचा पोशिंदा आहे. सर्व गोष्टी आम्हालादेखील माहिती आहेत. आम्ही देखील शेतकरी आहेत. पण काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? त्या मनात ठेवायच्या असतात. पण, कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे हे होत आहे. पण हे मला महागात पडते आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. याशिवाय, कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खाते अजितदादांनी दिले, असे ते एका कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांनी मोठा वाद निर्माण झाला. विरोध यावरुन सरकारवर टीका करत आहेत.
कोकाटेंचे स्पष्टीकरणटीका झाल्यानंतर कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. मी असे काही बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. सध्या शेतात कपाशी नाही, सोयाबीन नाही. आता फळबागा उभ्या आहेत, अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतात काहीही नाही, तेथील पंचनामे करुन काय करणार? काही भागात कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे, जेवढे नुकसान झाले, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे, अशी सारवासारव त्यांनी केली.
कोकाटे यांची यापूर्वीची विधाने१. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता.२. आता भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो.३. स्वीय सहायकांच्या बदल्यांचे अधिकारसुद्धा कृषिमंत्र्यांना नाहीत.