नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 07:16 IST2022-10-29T05:56:27+5:302022-10-29T07:16:17+5:30
माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणुकीची विनंती केली होती.

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी
- कमल शर्मा
नागपूर : वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणत्या शहरात यावा, यावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे.
याबाबत अंतिम निर्णय वायुसेना व टाटा समूहाला घ्यायचा होता; परंतु नागपूर व नाशिकमध्ये संघर्ष व गुजरातमध्ये वडोदरासाठी एकमत होणे या प्रकल्पासाठी निर्णायक बाब ठरल्याचे सांगितले जात आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणुकीची विनंती केली होती. ‘लोकमत’कडे भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत आहे. यात त्यांनी प्रकल्पासाठी नाशिकमध्ये सर्वाधिक उपयुक्त स्थान असल्याचे म्हटले होते. येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चा प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असेही सांगितले होते.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हा प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी मागच्या महिन्यातच याबाबत दिल्लीत चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्प मिहानमध्ये येत असल्याचे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते.
मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. एअरबस प्रकल्प नागपुरात आला असता तर त्याला प्रोत्साहन मिळाले असते. विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसायही विकसित झाला असता.
- प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष, वेद