धक्कादायक प्रकार! अफजल खानाचा वध दाखवल्यानं कॉलेज तरुणांना माफी मागायला लावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 06:20 PM2024-01-30T18:20:51+5:302024-01-30T18:21:23+5:30
यानंतर जर असे प्रकार घडले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या स्टाईलनं उत्तर देईल. विद्यार्थ्यांनी बिल्कुल घाबरू नये असं मनसे नेत्यांनी सांगितले.
![Afzal Khan's killing scene in powada, forced college youth to apologize at Akola | धक्कादायक प्रकार! अफजल खानाचा वध दाखवल्यानं कॉलेज तरुणांना माफी मागायला लावली Afzal Khan's killing scene in powada, forced college youth to apologize at Akola | धक्कादायक प्रकार! अफजल खानाचा वध दाखवल्यानं कॉलेज तरुणांना माफी मागायला लावली](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/sdhahsivajaiz-mahavaizice8s_2024011167481.jpg)
धक्कादायक प्रकार! अफजल खानाचा वध दाखवल्यानं कॉलेज तरुणांना माफी मागायला लावली
अकोला - छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करताना अफजल खानाचा वध दाखवल्याप्रकरणी तरुणांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडला. अफजल खानाच्या वधाचं दृश्य दाखवल्याने भावना दुखावल्याचं काही विद्यार्थ्यांनी म्हटलं. त्यानंतर नाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं असं सांगितले जाते.
याबाबत विद्यालयातील विद्यार्थी मनीष खाडे यांनी सांगितले की, आमच्या महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होता. त्यानिमित्ताने आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करत होतो. त्या पोवाड्यात जो आपला इतिहास आहे तो सादर केला. मात्र त्याठिकाणी उपस्थिती काही समुदायाची मुले तिथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा येऊन त्या तरुणांनी या प्रसंगामुळे आमच्या भावना दुखावल्या असून माफी मागायला लावली. जेवढे पोवाडे सादर करणारे विद्यार्थी होते त्यांनी स्टेजवर येऊन आमची माफी मागावी असं त्या मुलांनी म्हटल्याचं खाडे यांनी सांगितले.
दरम्यान जी घटना घडली ती निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीत अशाप्रकारे घटना घडणे हे दु:खाचे आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने या घटनेत जे कुणी सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सनातनी संघटनेचे मयुर मिश्रा यांनी केले तर ज्या महाराष्ट्राची ओळख आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. तिथेच छत्रपतींचा अपमान झाला आहे. ज्या नालायक मुलांनी अशाप्रकारे कृत्य केले त्यांना लवकरात लवकर कॉलेजमधून काढून टाकावे. यानंतर जर असे प्रकार घडले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या स्टाईलनं उत्तर देईल. विद्यार्थ्यांनी बिल्कुल घाबरू नये. मनसे त्यांच्या सदैव पाठिशी आहे असं आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केले आहे. याआधीही महाराष्ट्रात अशाप्रकारे अफजल खानाच्या वधाचे दृश्य साकारल्यामुळे काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.