"अबू आझमी निलंबित झाला पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे"; एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:21 IST2025-03-04T13:20:54+5:302025-03-04T13:21:28+5:30
"हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही..."

"अबू आझमी निलंबित झाला पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे"; एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले
सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'छावा' चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले बलिदान अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. चित्रपट पाहून सर्वांचेच डोळे पाणावत आहेत. त्यांचे बलिदान तरूण पिढीला प्रेणार देणारे आहे. सत्ता धाऱ्यांपासून ते अगदी विरोधकांपर्यंत सर्वचजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मात्र, यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कोतुक करत वादग्रस्त विधान केले आहे. "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?" असा प्रश्न करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती," असे अबू आझमी यांनी म्हटले होते. आझींच्या या विधानाचे पडसाद आज विधानसभेत बघायला मिळाले. 'अबू आझमींना निलंबित करण्याची आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
यासंदर्भात विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "काल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमाण करतो.
"छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमाण करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. म्हणून, आपण 'छावा' बघा, रईस... छावा सिनेमा बघा," असेही शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांवर ४० दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंग सोलले, त्यावर मीठ टाकले, एवढा अपमाण केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमाण आहे. आपल्या देशभक्तीचा अपमाण आहे. मी एवढेच सांगतो,
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।"
शंभू राजाने ९ वर्षांत ६९ लढाया जिंकल्या -
शिंदे म्हणाले, "अरे या शंभू राजाने ९ वर्षांत ६९ लढाया जिंकल्या." यानंतर विरोधकांकडे हात वारे करत शिंदे म्हणाले, "अरे लाज वाटायला हवी. या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडून टाकली. आया-बहिणींवर अत्याचार केला. आया-बहिणींवर बलात्कार झाले. या औरंग्याने बापाला कैद केले, मुलांना मारून टाकले. २७ लोकांना मारले. असे सांगत, अबू आझमी निलंबित झाला पाहीजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणी यावेळी शिंदे यांनी केली.