मुंबई - अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे.
आषाढी वारीला ८०० वर्षाची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरुन पालखी निघते. संत तुकारामांच्या देहू येथूनही पालखी निघते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकर्यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबू आझमी यांना करून दिली आहे.
कायम हिंदू - मुस्लिम राजकारण करुन अबू आझमी प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारने करावी, अशी मागणी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी केली. यावेळी महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशाप्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार कधीही घेणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भूमिका स्पष्ट केली.