दहा एकरांमध्ये क्रांतिज्योतींचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:35 IST2025-01-04T12:35:03+5:302025-01-04T12:35:23+5:30
नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन...

दहा एकरांमध्ये क्रांतिज्योतींचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री
खंडाळा (जि. सातारा) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी असलेल्या नायगावच्या मातीतून वेगळी ऊर्जा मिळते. छगन भुजबळ यांच्यामुळे या भूमीच्या विकासाला प्रारंभ झाला. येथील उर्वरित विकास कामे केल्याशिवाय सरकार थांबणार नाही. दहा एकरांमध्ये सावित्रीमाईंचे भव्य स्मारक उभारून फुले दाम्पत्यांच्या समतेच्या विचाराच्या मार्गाने सरकार काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, शंभूराज देसाई, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, तत्कालीन काळात समतेचे बिजारोपण झाले, यासाठी फुले यांनी काम केले. आगामी पाच वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्या पाहायला मिळतील. त्यामुळे सावित्रीमाईंचे स्मारक करून दाखवू. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा एकर जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया सुरू करावी.
नायगाव ग्रामविकास विभागाकडे दत्तक : गोरे
सावित्रीबाईंनी जगाला समतेचा विचार दिला. माता-भगिनींना सन्मानाचे स्थान दिले. इथल्या मातीचा स्पर्श ऊर्जा देणारा आहे. या भूमीच्या विकासासाठी हे गाव ग्रामविकास विभागाकडून दत्तक घेऊन सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
फुले वाडा आराखडा मंजूर व्हावा : भुजबळ
समाजाची सेवा हे व्रत फुले दाम्पत्यांनी जोपासले. नायगावसह पुणे येथील फुले वाडा व अरणच्या भूमीचा आराखडा मंजूर व्हावा. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीसाठी जागा उपलब्ध व्हावी. म्हणजे, ती महाज्योतीच्या वतीने उभारली जाईल, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले.