८५ वर्षांच्या आजोबांकडे एका विद्यापीठाच्या सर्व पदव्या ! नागपूर विद्यापीठात २९ व्या पदवीची तयारी
By निशांत वानखेडे | Updated: April 8, 2026 19:42 IST2026-04-08T19:41:38+5:302026-04-08T19:42:25+5:30
Nagpur : नागपूर केंद्रातून पाच पदव्या पूर्ण केल्या असून, ते सध्या पर्यावरण आणि शाश्वत विकास विषयात पदव्युत्तर डिप्लोमा करत आहेत.

85-year-old grandfather holds all the degrees from one university! Preparations for 29th degree at Nagpur University
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते, हे तुम्ही ऐकलेच आहे. पण, एखाद्या तरुणाला त्याच्याच अभ्यासाचा कंटाळा येत असेल, नापास झालेल्यांना जीवनात नैराश्य आले असेल किंवा निवृत्त झालेल्यांना वेळ कसा घालवावा हा विचार सतावत असेल, तर तुम्ही डॉ. दिगांबर आलसी या तरुण आजोबाला भेटलेच पाहिजे. या आजोबांचे वय आहे ८५ वर्षे. या वयात त्यांनी इग्नूकडून मंगळवारी पदती स्वीकारली. ही त्यांची चक्क २४ वी पदवी आहे. पदवी घेतली आणि थेट घरी जाऊन पुस्तकात शिरले. जून महिन्यात त्यांच्या २५ व्या पदवीचा पेपर आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) च्या ३९ व्या दीक्षान्त समारंभात पदवी स्वीकारणाऱ्या डॉ. दिगांबर अलसी यांची भेट झाली. अभ्यासाने झपाटलेले अजब व्यक्तिमत्त्व. दिगांबर यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी १९४१ सालचा. १९६४ साली त्यांनी व्हीआरसीई (आता व्हीएनआयटी) येथून बीई इलेक्ट्रिकलची पहिली पदवी प्राप्त केली होती. ही व्हीआरसीईची पहिलीच बॅच होती. त्यांना लगेच जीईसी कंपनीत नोकरी मिळाली. येथे शाखा व्यवस्थापक म्हणून १९ वर्षे सेवा दिली व पुढे मुंबईला महाव्यवस्थापक म्हणून १० वर्षे दिल्यानंतर ते निवृत्त झाले.
या काळात ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी विधी अभ्यासक्रम व एमबीएची पदवी मिळवली. निवृत्तीनंतर ते या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात होते. नंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांचा झपाटल्यागत अभ्यास केला. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोक प्रशासन, तत्त्वज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांचे अभ्यासक्रम, एम.कॉम. अशा सर्व पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. अशा एकूण १९ पदव्या त्यांनी विद्यापीठातून प्राप्त केल्या. येथील अभ्यासक्रम संपले, तेव्हा त्यांनी ईग्नू कडे मोर्चा वळविला आणि या मुक्त विद्यापीठातून एमए डेव्हलपमेंट, आर्कियालॉजी, अॅन्थ्रॉपोलॉजी, गांधीयन पीस स्टडी आणि आता एम.ए. (डेव्हलपमेंट स्टडीज) पूर्ण केले आहे. निवृत्त झाल्यानंतर ही त्यांची बारावी पदवी होय.
तीन पुस्तकांचे लेखनही
डॉ. आलसी अभ्यासासोबत लेखन कार्यातही सक्रिय आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह व एक लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या 'वास्तव जीवन' या पुस्तकाचे लेखन सुरू आहे. डॉ. आलसी यांच्या कुटुंबात पत्नी यामिनी, मुलगा व दोन मुली असे सर्व डॉक्टर आहेत. त्यांनी नॅचरोपॅथीची पदवी पूर्ण केली. त्यांना विद्यापीठाकडून मानद डी.लिट. पदवी मिळाली आहे.