२५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी; विमा कंपन्या राजी! पावसाच्या खंडामुळे २५ % लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:19 IST2023-11-03T12:19:21+5:302023-11-03T12:19:33+5:30

२८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड

25 lakh farmers will get 1,352 crores; Insurance companies agreed! 25% gain due to rainfall volume | २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी; विमा कंपन्या राजी! पावसाच्या खंडामुळे २५ % लाभ

२५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी; विमा कंपन्या राजी! पावसाच्या खंडामुळे २५ % लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पंतप्रधान खरीप पीक योजनेंतर्गत २१ दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे, तर चार जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहेत. २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली होती. कृषी विभागाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले होते. 

वाशिमबाबत संभ्रम

विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यातील बुलढाणा, बीड व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली असून, त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यांतील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्याबाबत संभ्रम कायम आहे. 

ही आहे स्थिती

  • या जिल्ह्यांमध्ये मिळणार अग्रिम : नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, पुणे, धाराशिव.
  • विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे : कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना, नागपूर.
  • अंशत: आक्षेप असलेले जिल्हे : नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, अकोला.
  • निर्णय न झालेले जिल्हे : चंद्रपूर, नांदेड, लातूर व हिंगोली.

Web Title: 25 lakh farmers will get 1,352 crores; Insurance companies agreed! 25% gain due to rainfall volume