निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होणार; लातुरातील बोंबळी ग्रामस्थांचा इशारा

By संदीप शिंदे | Updated: December 6, 2022 19:39 IST2022-12-06T19:38:47+5:302022-12-06T19:39:11+5:30

शासकीय योजनांसाठी भेदभाव केला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

will join Karnataka by boycotting elections; Warning of Bombli villagers in Latur | निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होणार; लातुरातील बोंबळी ग्रामस्थांचा इशारा

निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होणार; लातुरातील बोंबळी ग्रामस्थांचा इशारा

लातूर : एकिकडे सीमाभागातील मराठी भाषिक गावे कर्नाटकातूनमहाराष्ट्रात येण्यास इच्छुक असताना देवणी तालुक्यातील बोंबळी (बु.) च्या गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्ही कर्नाटकात सामील होऊ, असा इशारा मंगळवारी दिला आहे.

बीदर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील मराठी भाषिक गावे वर्षानुवर्षे महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत राहिले. आजही त्या गावांचा व्यवहार महाराष्ट्रात अधिक आहे. दरम्यान, महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्न पेटल्यानंतर नवनवीन चर्चा समोर येत आहेत. अजूनही मराठी भाषिक गावे महाराष्ट्राशी जोडून राहू इच्छितात. परंतु, देवणी तालुक्यातील बोंबळी (बु.) येथील गावकऱ्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. शासकीय योजनांसाठी भेदभाव केला जात आहे, असा आरोप केला जात आहे. शिवाय, याउलट कर्नाटक सरकार शेतकरी आणि गरीब जनतेसाठी चांगल्या योजना राबवीत आहे, असे सांगत ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत प्रशासनाकडे निवेदन दिले असून, त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, शाळेची उत्तम व्यवस्था करा, कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळाले. आम्हालाही अनुदान उपलब्ध करून द्या. स्थानिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, शेतीसाठी १०एचपीपर्यंत मोफत वीज द्या, अशी मागणी केली आहे.यावेळी ग्यानोबा कारभारी, देविदास दुंडिबा, सोमशेखर दयानंद, देवीदास गोविंदाराव, चंद्रकांत नारायणराव, श्रीमंत माणिकराव, संजा कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: will join Karnataka by boycotting elections; Warning of Bombli villagers in Latur