जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:51 IST2025-06-30T17:50:47+5:302025-06-30T17:51:15+5:30
मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर; प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसायची कशी, हा यक्ष प्रश्न

जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू !
- सलीम सय्यद
अहमदपूर (जि. लातूर) : पेरणी, मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसायची कशी, हा यक्ष प्रश्न सध्या उभा आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण अहमदपूर तालुक्यातील हडोळती शिवारात रविवारी पहायला मिळाले. पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार यांनी स्वतःस कोळपणीच्या कामाला जुंपून घेतले आहे. सोबतीला पत्नी मुक्ताबाई होत्या.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार (७५) यांना गावानजीक सर्व्हे क्र. ५४ मध्ये २ एकर ९ गुंठे शेती आहे. कुटुंबात त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार, सून आणि दोन नातू आहेत. मुलगा रत्नाकर याचे आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, तो पुण्यात खाजगी कंपनीत कामाला आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि मृगाच्या प्रारंभीच्या पावसावर शेतकरी अंबादास पवार यांनी उसनवारी करुन शेतात कापसाची लागवड केली.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने कापसाच्या पिकांत तण वाढले आहे. त्यामुळे ते बैलजोडीच्या सहाय्याने काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांकडे चौकशी केली. परंतु, दिवसाला अडीच हजार रुपयांचा दर सांगण्यात आला. एवढी रक्कम नसल्याने नाईलाजास्तव त्यांनी स्वत:च कोळपणीचा जू खांद्यावर घेतला. वयोवृध्द पतीचे श्रम पाहून पाणावलेल्या डोळ्यांनी पत्नी मुक्ताबाई पवार यांनी त्यांना शेतीकामास मदत केल्याचे पहावयास मिळाले. कोळपणी करताना ७५ वर्षीय अंबादास यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. परंतु, आर्थिक अडचणींमुळे त्यांना खांद्यावर जू घ्यावा लागला.
२० हजारांचे कर्ज काढले
पेरणीसाठी पैसे नसल्याने २० हजार रुपयांचे कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरली. शेतात विहीर आहे, पण पाऊस नसल्याने पाणी नाही. शेतीसाठी यापूर्वीच सोसायटीचे ४० हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, डोक्यावरील कर्जाचा बोजा अजून कमी झाला नाही. शेतीमालाला भाव नाही, जगावे कसे? असा प्रश्न शेतकरी अंबादास पवार यांनी उपस्थित केला.
पतीचे श्रम पहावेनात
शेतीवरच कुटुंबाची उपजीविका आहे. मात्र, निसर्गाने साथ न दिल्याने डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. कापसातील तण काढण्यासाठी ७५ वर्षीय पतीने स्वत:च्या खांद्यावर जू घेतला. पतीचे हे श्रम पाहावत नाही. पण सांगायचे कुणाला?.
- मुक्ताबाई अंबादास पवार, महिला शेतकरी.