रेल्वे तिकीट बुकिंगला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:20 AM2021-04-20T04:20:19+5:302021-04-20T04:20:19+5:30
खरीप हंगामासाठी खते, बियाणांचे नियोजन लातूर : राज्यात यंदा मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचे सूतोवाच हवामान विभागाने केले आहे. ...
खरीप हंगामासाठी खते, बियाणांचे नियोजन
लातूर : राज्यात यंदा मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचे सूतोवाच हवामान विभागाने केले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्वमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असतो. परिणामी, शेतकरी बांधवांच्या वतीने खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या वतीनेही गावनिहाय पेरणी क्षेत्राचा आढावा घेतला जात आहे. एकंदरीत खरीप हंगाम पूर्वकामांना जिल्ह्यात वेग आल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभ
लातूर : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ५७ हजार शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळालेली आहे, तर दीड हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने सदरील शेतकरी कर्जमुक्त योजनेपासून वंचित आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर योजनेतील पात्र लाभार्थींना कर्जपुरवठा करता यावा, यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे.
शासकीय कार्यालयात उपाययोजनांची अंमलबजावणी
लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग केली जात असून, सॅनिटायझर आणि मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात येत आहे. सर्वच कर्मचारी मास्क, फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करीत असल्याचे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील चित्र आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी जनजागृती मोहीम
लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लस दिली जात आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने लसीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या वतीने दवंडीद्वारे ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात मनपा आणि ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
लातूर : राज्य मंडळाच्या वतीने दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध शाळांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येत आहे. यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, योगा, अभ्यास, सराव चाचणी आदी बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, शाळांच्या वतीने दर आठवड्याला प्रेरणादायी वक्त्यांची व्याख्याने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जात आहेत.
शहरात उड्डाणपुलाच्या भिंतीची रंगरंगोटी
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर, सुंदर शहर उपक्रमांतर्गत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. याद्वारे पर्यावरण संवर्धन तसेच जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून रंगरंगोटीचे काम सुरू होते. आकर्षक रंगरंगोटी केली असल्याने बोलक्या भिंती वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहर महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत असून, भिंती लक्ष वेधून घेत आहेत.
समांतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
लातूर : शहरातील पाण्याची टाकी ते पाच नंबर चौकाकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील दुभाजकाचे काम पूर्ण झाले असून, काही डांबरीकरण करण्यात आले आहे तर काही ठिकाणी डांबरीकरण अपूर्ण आहे. त्यातच रस्त्याच्या मधोमध नाली खोदकाम करण्यात आले असून, व्यवस्थित दबाई केलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.